U19 World Cup 2022: पाचव्या अंडर-19 चॅम्पियनशिपसाठी भारताचे यंगस्टर्स सज्ज, प्रशिक्षकाने उघड केली खास रणनीती
भारताचा U19 संघ (Photo Credit: PTI)

U19 World Cup 2022: भारतीय U19 संघ (India U19 Team) शुक्रवारपासून विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत. संघाला पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेसारख्या (South Africa) बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे. सामन्यापूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर (Hrishikesh Kanitkar) यांनी स्पर्धेतील आपल्या रणनीतीबद्दल बोलताना सांगितले की, विश्वचषक स्पर्धेदरम्यान त्यांचा संघ लक्ष्य सेट करेल आणि त्यावर काम करेल. अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) स्पर्धेत भारताला समृद्ध वारसा मिळाला आहे आणि तो पुढे चालू ठेवण्याचा कानिटकर प्रयत्न करतील. U19 वर्ल्ड कप 2021 आजपासून म्हणजेच शुक्रवार 14 जानेवारीपासून वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणार आहे. शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्याने भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. टीम इंडिया (Team India) या स्पर्धेत सर्वाधिक चार विजेतेपद काबीज करणारा एकमेव संघ असून त्यांचे लक्ष यश धुल्लच्या नेतृत्वात पाचव्या जेतेपदावर असेल. (India U-19 World Cup 2022 Schedule: यश धुल्लच्या अंडर-19 संघाचे असे आहे संपूर्ण WC वेळापत्रक, जाणून घ्या कोणत्या संघाशी कधी भिडणार भारताचे यंगस्टर्स)

भारतीय संघाने यापूर्वी 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर गेल्या तीन वेळा अंतिम फेरी गाठण्यात भारत यशस्वी ठरला आहे. गतवेळी संघाला अंतिम फेरीत बांगलादेशविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, यावेळी तो पुन्हा चॅम्पियन बनण्यासाठी सज्ज झाला आहे. स्पर्धेपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना कानिटकर म्हणाले, “भारताने या स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करत संघाला मोठा वारसा दिला आहे. नवीन टूर्नामेंटमध्ये त्याचा फायदा होत नाही, पण आम्ही चार वेळा चॅम्पियन बनलो आहोत. ही एक नवीन टीम आहे, त्यामुळे तुम्हाला सुरवातीपासून सुरुवात करावी लागेल.”

ते पुढे म्हणाले, “आम्ही आयपीएल लिलाव आणि रणजी करंडक यांसारख्या गोष्टींपेक्षा जास्त पुढे पाहू इच्छित नाही. तथापि सध्या आम्हाला या स्पर्धेत काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आम्ही, एक कोचिंग युनिट म्हणून, या अल्प कालावधीत आम्ही काय करू शकतो हे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहोत.” बायो-बबलच्या कठीण परिस्थितीत खेळण्याबद्दल विचारले असता, माजी भारतीय क्रिकेटपटू म्हणाले की तक्रार करण्यापेक्षा त्याची सवय करणे चांगले आहे. तसेच आशिया चषक स्पर्धेत संघाला एकत्र खेळण्याची संधी मिळाल्याने आशिया चषक स्पर्धेतील विजयाचा फायदा संघाला होईल असे मुख्य प्रशिक्षक म्हणाले. “हे महत्त्वाचे आहे कारण आम्ही यापूर्वी एक संघ म्हणून एकत्र खेळलो नाही. तो आमच्यासाठी संघ बांधणी आणि सामना सरावाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. त्याचा खूप फायदा झाला,” त्यांनी पुढे म्हटले.