स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य बलिदानाची आठवण करून देणारा ११ मार्च हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात 'बलिदान दिन' म्हणून पाळला जात आहे. १६८९ मध्ये औरंगजेबाच्या कैदेत असताना अमानवीय यातना सोसूनही स्वराज्यनिष्ठा आणि स्वाभिमान न सोडणाऱ्या या महापराक्रमी राजाला आज ठिकठिकाणी अभिवादन केले जात आहे. पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक या ऐतिहासिक स्थळांवर शिवभक्तांची मोठी गर्दी झाली असून, 'धर्मवीर' महाराजांच्या शौर्याचा जागर सुरू आहे.
'बलिदान मास' आणि शिवभक्तांचे व्रत
गेल्या ४० दिवसांपासून सुरू असलेल्या 'बलिदान मासा'चा आज महत्त्वाचा टप्पा आहे. अनेक शिवभक्त या काळात अनवाणी चालणे, जमिनीवर झोपणे आणि गोड पदार्थांचा त्याग करणे यांसारखी कडक व्रते पाळतात. महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेत सोसलेल्या ४० दिवसांच्या हालअपेष्टांची जाणीव तरुण पिढीला व्हावी, या उद्देशाने हा काळ सुतकाप्रमाणे पाळला जातो. यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त मराठीत श्रद्धांजली
देहाने संपविले तरी, विचाराने जो अमर झाला... अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार अभिवादन!"

"ज्यांच्या शौर्याची गाथा आजही सह्याद्रीच्या कडाकडात घुमतेय, अशा स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन."

"मृत्यू समोर असतानाही ज्यांनी स्वराज्याची आणि धर्माची साथ सोडली नाही, त्या शंभूराजांना कोटी कोटी प्रणाम."

"धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!"

"स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!"

"शिवपुत्र संभाजी महाराज: शौर्य आणि त्यागाचे दुसरे नाव. मानाचा मुजरा!"
तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे विशेष कार्यक्रम
पुण्याजवळील भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावर असलेल्या तुळापूर येथे, जिथे महाराजांची हत्या करण्यात आली, तिथे आज सकाळी विशेष आदरांजली सभा आयोजित करण्यात आली. तसेच वढू बुद्रुक येथे, जिथे महाराजांवर अंत्यसंस्कार झाले, तिथे मूक पदयात्रा काढण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात असून लाखो भाविक नतमस्तक होण्यासाठी येत आहेत.
शौर्य आणि विद्वत्तेचा वारसा
छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक उत्तम योद्धाच नव्हते, तर ते अत्यंत विद्वान देखील होते. त्यांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी 'बुधभूषण' या संस्कृत ग्रंथाची रचना केली होती. त्यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी मुघल, पोर्तुगीज आणि सिद्दी अशा अनेक शत्रूंना एकाच वेळी यशस्वीपणे झुंजवले. औरंगजेबाला दख्खन जिंकण्याचे स्वप्न कधीही पूर्ण करू न देणाऱ्या या राजाची स्वराज्यनिष्ठा आजही भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे.