IND vs ENG 4th T20I 2021: 'करो या मरो'च्या सामन्यापूर्वी टीम इंडियात गहन चर्चा, BCCI ने ट्विट करुन लिहिले... 
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th T20I 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात आज अहमदाबाद येथे चार सामन्यांच्या टी-20 मालिकेचा चौथा सामना खेळवला जाणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत सध्या इयन मॉर्गनचा इंग्लिश संघ 2-1 अशा आघाडीवर असून मालिकेच्या दृष्टीने हा सामना निर्णायक असणार आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं बंधनकारक असणार आहे. यामुळे टीम इंडियासाठी (Team India) ही मॅच ‘करो या मरो’ची असणार आहे. भारतीय संघाला (Indian Team) देखील हे कळून चुकले असून सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी संघ मैदानावर गहन चर्चा करताना दिसली. या सामन्यात जर भारतीय संघाचा पराभव झाला तर इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका विजयाचे त्यांचे स्वप्न भंग होईल. अशास्थितीत यजमान आणि पाहुण्या संघाचे खेळाडूं चौथ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी सज्ज आहेत. (IND vs ENG 4th T20I 2021 Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील चौथा टी-20 सामना लाईव्ह कुठे, कधी आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर)

सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाचे सर्व सदस्य मैदानावर विचार मंत्रणा करताना दिसले. या क्षणाचे एक फोटो बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे शेअर केले आहे. या फोटोमध्ये सर्व खेळाडू सामन्यापूर्वी जमा होऊन चर्चा करताना दिसत आहेत. हा फोटो ट्विटरवर शेअर करताना बीसीसीआयने लिहिले की, “हा सामना दिवस आहे.” या व्यतिरिक्त त्यांनी पुढे असेही लिहिले की, “चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडिया पुनरागमन करेल आणि मालिका बरोबरीत आणेल.” टीम इंडियासमोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे सलामी जोडीचे असेल. केएल राहुल मागील दोन्ही सामन्यात आपयशी ठरला आहे, त्यामुळे संघ सलग चौथ्यांदा सलामीच्या जोडीत बदल करते की नाही  सर्वांच उत्सुकता लागून राहिली आहे. राहुलने पहिल्या तीनही सामन्यात सातत्याने निराशाजनक कामगिरी केली, मात्र त्यानंतरही संघाने त्याच्यावर विश्वास कायम ठेवला आहे.

दुसरीकडे, भारतीय फलंदाजांसमोर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडचे आव्हान असणार आहे. इंग्लंडचा हा वेगवान गोलंदाज यजमान संघासाठी डोकेदुखी ठरत आहे त्यामुळे वूडचा सामना करण्यासाठी टीम इंडियाला कठीण रणनीती आखण्याची गरज आहे. याशिवाय, टीम इंडियाची फिरकी गोलंदाजी ही चिंतेचा विषय बनली आहे. संघाचा मुख्य फिरकीपटू युजवेंद्र चहल मागील तीन सामन्यात महागडा सिद्ध झाला आहे त्यामुळे, आघाडीचा गोलंदाज असल्यामुळे त्याच्याकडून आजच्या निर्णायक सामन्यात संघाला आक्रमक गोलंदाजी अपेक्षा असेल.