IND vs BAN 2019: दिल्ली मॅचबद्दल झाला मोठा खुलासा, बॅटिंग करताना दोन बांग्लादेशी फलंदाजांनी केली होती उल्टी 
सौम्य सरकार (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) संघातील पहिला टी-20 सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitely Stadium) खेळला गेला. या सामन्यात बांग्लादेशने भारताला 7 गडी राखून पराभूत केले आणि भारतीय संघावर पहिल्यांदा टी-20 सामन्यात विजय मिळवला. हा सामना दिल्लीच्या वायू प्रदूषणामुळे प्रभावित राहिला. सामन्यापूर्वी बांग्लादेशच्या खेळाडूंनी मुखवटा लावून सराव केला. खराब प्रकाश आणि धुक्यामुळे सामना रद्द करण्याची मागणीही करण्यात आली होती, पण शेवटी हा सामना खराब गुणवत्तेच्या हवामानात खेळला गेला.आणि यामॅच संदर्भात एक रिपोर्ट समोर आली आहे. या सामन्यादरम्यान दोन बांगलादेशी खेळाडूंना उलट्या झाल्याचे अहवालात उघडकीस आले आहे. (IND vs BAN 2nd T20I: रोहित शर्मा नोंदवणार टी-20 शतक, 'ही' ऐतिहासिक कामगिरी करणारा बनणार पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू)

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, बांग्लादेशच्या सौम्य सरकार (Saumya Sarkar) आणि आणखी एका खेळाडूला सामन्यादरम्यान उलट्या झाल्या होत्या. दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून दिल्लीतील हवेची परिस्थिती चांगली नाही. आणि यामुळे खेळाडूंना उलट्या झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात 149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशच्या दोन्ही फलंदाजांनी मैदानात उलट्या केल्या. प्रदूषणाची धोकादायक पातळी असूनही सामना दिल्ली येथे खेळविण्यात आला. सौम्या सरकारने 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि मुश्फिकुर रहीम याच्याबरोबर 60 धावांची भागीदारी केली करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात बांग्लादेशने सात गडी राखून विजय मिळविला.

दरम्यान, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोन्ही संघांचे कठीण परिस्थितीत खेळल्याबद्दल आभार मानले. गुरुवारी दोन्ही संघात दुसरा टी-20 सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. बांग्लादेशने मागील सामन्यातील विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.