मॅथ्यू वेड-ग्लेन मॅक्सवेल (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 3rd T20I: ऑस्ट्रेलिया (Australi) आणि भारत (India) यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात पहिले फलंदाजी करत कांगारू संघाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 186 धावांपर्यंत मजल मारली आणि विराटसेनेसमोर 187 धावांचं तगडं आव्हान उभं केलं. यजमान ऑस्ट्रेलियासाठी मॅथ्यू वेड (Matthew Wade) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला आणि फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. वेडने 80 धावा आणि मॅक्सवेल 54 धावा करून परतला. स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) 24 धावांचे योगदान दिले तर कर्णधार आरोन फिंच भोपळाही फोडता माघारी परतला. वेड आणि मॅक्सवेलची भारतीय गोलंदाजांवर भारी पडली. भारतीय गोलंदाज या जोडीपुढे निरुत्तर दिले. वॉशिंग्टन सुदर वगळता अन्य गोलंदाज विकेट घेत ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्यात अपयशी दिसले. सुंदरला 2 तर शार्दूल ठाकूर आणि टी नटराजन यांना मोक्याच्या क्षणी प्रत्येकी 1 विकेट मिळाली. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात मॅक्सवेलला तीनदा जीवदान मिळाले. (IND vs AUS T20I: SCG वर झळकलं 'Miss You MS Dhoni' चं पोस्टर, पाहून विराट कोहलीच्या प्रतिक्रियाने जिंकले मन, पाहा Video)

टॉस गमावून पाहिले फलंदाजी करणाऱ्या कांगारुंची खराब सुरुवात झाली. सुंदरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याचा फिंच प्रयत्नात फसला आणि हार्दिक पांड्याच्या हाती झेलबाद झाला. कर्णधार फिंच माघारी परतल्यानंतर वेड आणि स्मिथने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना केला. वेडने आक्रमक पवित्रा आजमावला आणि मैदानात फटकेबाजी केली. यादरम्यान सुंदरने स्मिथ त्रिफळाचीत करत संघाला दुसरा धक्का दिला. दुसऱ्या विकेटसाठी वेड आणि स्मिथमध्ये 55 धावांची भागीदारी झाली. यानंतर भारतीय गोलंदाजांची क्लास घेत वेडने सलग दुसरे अर्धशतक ठोकले. उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात ग्लेन मॅक्सवेल विकेटकीपर केएल राहुलकडे झेलबाद झाला, पण थर्ड अंपायरच्या पाहणीत चहलने टाकलेला चेंडू नो-बॉल असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर दीपक चाहरने मॅक्सवेलचा झेल सोडला जे टीमवर भारी पडले. मॅक्सवेलने चौफेर फटकेबाजी करत 31 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. मोक्याच्या क्षणी शार्दूलने वेडला बाद करून जमलेली जोडी मोडली. वेड आणि मॅक्सवेल जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली.

यापूर्वी, कॅनबेरा आणि सिडनीमधील दुसरा सामना जिंकून भारताने टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकून त्यांच्यासमोर यजमान कांगारूंचा दुसऱ्यांदा टी-20 मालिकेत क्लीन स्वीप करण्याची संधी आहे.