Fact Check: पुढील 10 दिवसांसाठी भारतात इंटरनेट सेवा बंद राहणार? WhatsApp वर व्हायरल होणाऱ्या या मेसेजमागील नेमके सत्य काय? जाणून घ्या
Internet shutdown Fake News. (Photo Credits: WhatsApp)

संपूर्ण जगाला हादरुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारत देशात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. देशात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी देशात लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात केवळ जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. दरम्यान काही फेक न्यूज, अफवा डोकं वर काढत आहेत. रात्री 12 पासून 10 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याची बातमी सोशल मीडियात चांगलीच व्हायरल होत आहे. तर इंटरनेट बंद राहणार असल्याचा मेसेज व्हॉट्सअॅपवर पंतप्रधान मोदींच्या फोटोसह फिरत आहे. सोशल मीडियावर काही युजर्स इंटरनेट बंद राहणार असल्याचा दावा करत असल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे. (Fact Check: नागपूर शहरात 59 नव्या कोरोनाबाधितांमध्ये 3 डॉक्टरांचा समावेश अशी सोशल मीडीयात फिरणारी ऑडिओ क्लिप खोटी; PIB in Maharashtra ने केला खुलासा)

इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती केंद्र सरकारकडून आलेली नाही. त्यामुळे 10 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद राहणार ही केवळ अफवा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या या अफवांवर विश्वास ठेवू नका. तसंच कोणत्याही बातमीची सतत्या पडताळून पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवणे टाळा.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेजेस:

आठवड्याभरासाठी इंटरनेट सेवा बंद राहील, असे या युजरचे म्हणणे आहे.

तर इंटरनेट सेवा खरंच बंद राहणार का, अशी विचारणा हा युजर करतो आहे.

इंटरनेट बंद होणार असल्यामुळे घरी बसून आता माशा माराव्या लागणार असे हा युजर म्हणतो आहे.

तर रात्री 12 पासून इंटरनेट सेवा बंद होईल का, असे हा युजर विचारत आहे.

तर इंटरनेट हे मनोरंजनाचे साधन आहे. त्यामुळे घरात बसणे सोपे होते. मात्र इंटरनेट बंद झाल्यास खूप कठीण होईल, असे हा युजर म्हणतो आहे.

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. केवळ सुरक्षिततेसाठी घरी राहण्याचा सल्ला नागरिकांना दिला जात आहे. मात्र लॉकडाऊनमुळे आधीच अस्वस्थ असलेल्या लोकांचा गोंधळ उडवण्याचे काम हे फेक मेसेजेस करतात. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन सरकारकडूनही करण्यात येत आहे.