टेक ऑफ केलेले Akasa Airlines चे विमान पुन्हा Mumbai Airport वर परतले, इंजिनमधून वास येत असल्याने घेतला निर्णय
Akasa Airlines (PC - Wikimedia Commons)

आकासा एअरलाइन्सच्या (Akasa Airlines) विमानाला टेक ऑफ केल्यानंतर मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) परतावे लागले. विमानाच्या केबिनमध्ये काहीतरी जळत असल्याचा वास आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. शनिवारी आकासा एअरलाइन्सच्या बोईंग मॅक्स VT-YAE विमानाने उड्डाण केले तेव्हा त्याचे इंजिन सामान्यपणे काम करत होते, परंतु केबिनमधून जळल्यासारखा वास येत होता, असे सांगण्यात येत आहे. विमान मुंबईहून बंगळुरूला जात होते. जळण्याचा वास आल्याने विमान मुंबईकडे वळवण्यात आले. मुंबईत तपासणी केली असता विमानात पक्षी आदळल्याचे आढळून आले. इंजिनमध्ये पक्ष्याचे अवशेष सापडले आहेत. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.

अहवालानुसार, भारतातील दिवंगत गुंतवणूकदार आणि स्टॉक ट्रेडर राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबाचा आकासा एअरलाइन्समध्ये सुमारे 45 टक्के वाटा आहे. झुनझुनवाला यांच्यानंतर कंपनीचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांच्याकडे 16.13 टक्के हिस्सा आहे. विनय दुबे व्यतिरिक्त कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये संजय दुबे, नीरज दुबे, पीएआर कॅपिटल व्हेंचर्स, माधव भातकुली आणि कार्तिक वर्मा यांचा समावेश आहे. हेही वाचा GN Saibaba: जीएन साईबाबा याचा मुक्काम तुरुंगातच,मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

कंपनीचे सीईओ विनय दुबे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, येत्या पाच वर्षांत 72 विमाने एअरलाइन्समध्ये समाविष्ट केली जातील. कंपनीने 72 MAX विमाने खरेदी करण्यासाठी गेल्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी बोईंगसोबत करार केला होता.  करारानुसार, मार्च 2023 पर्यंत 18 विमाने द्यायची आहेत तर उर्वरित 54 विमाने चार वर्षांच्या कालावधीत दिली जाणार आहेत.