'अर्णब गोस्वामी ला तात्काळ अटक करा' काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची गृहमंत्र्यांकडे मागणी
Sachin Sawant And Anil Deshmukh (Photo Credits: Twitter)

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता (Partho Dasgupta) यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट (WhatsApp Chat) सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमिनीच सरकली. या चॅटमध्ये पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राईकचा उल्लेख करण्यात आला होता. याचा अर्थ अर्णब गोस्वामी यांना याबाबत आधीच माहिती होती. त्यामुळे 'भारताच्या संरक्षणविषयक इतकी गोपनीय माहिती समोर येणे हा एक प्रकारचा देशद्रोह आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना तात्काळ अटक करा' अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना केली आहे. त्याबाबतचे निवेदन पत्र त्यांनी अनिल देशमुख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले.

'पुलवामा येथे सीआरएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोट येथे भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई करण्याच्या तीन दिवस आधी अर्णब गोस्वामी आणि पार्थो यांच्यात या हल्ल्याबाबतचा उल्लेख असणे ही कार्यालयीन गोपनीयता भंग करणारी गोष्ट आहे अशी माहिती सचिन सावंत यांनी दिली.हेदेखील वाचा- अर्णव गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्या लीक झालेल्या चॅट्समध्ये पुलवामा हल्ला, बालकोट एअर स्ट्राइकचा उल्लेख; अनिल देशमुख यांनी उपस्थितीत केला प्रश्न

"अर्णब गोस्वामी यांचे कृत्य हे Official Secrets Act, 1923, Sec. 5 नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी. या कायद्यानुसार कारवाई करणाचे अधिकार राज्य सरकारला आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारने अर्णब गोस्वामीना तात्काळ अटक करावी,"अशी मागणी सावंत यांनी केली आहे. तसेच नरेंद्र मोदी सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आलेली आहे असेही ते पुढे म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करू असे आश्वासन दिले आहे, अशी माहितीही सावंत यांनी दिली.