
महाराष्ट्र सरकारने मंगळवारी एक मोठी घोषणा केली. महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे (Covid-19) मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना लवकरच नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. सरकारने अशा कुटुंबियांना 50 हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर केली होती. आता अशा लोकांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारने मंगळवारी जारी केला आहे. सध्या 17 हजार मृतांच्या नातेवाईकांनाच शासनाकडून मदत दिली जाणार आहे.
या लोकांचे अर्ज समितीने मंजूर केले आहेत. विशेष म्हणजे मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची अधिकृत संख्या 1,47,860 आहे. या संदर्भात महसूल विभागाने शासन प्रस्ताव जारी करून कोषागाराला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, गेल्या सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 50,000 रुपयांची मदत देण्याचे आदेश दिले होते. त्याच वेळी, महाराष्ट्र सरकारनेही कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान जाहीर केले होते. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या आदेशात सरकारने केवळ 17,000 अर्जदारांनाच रक्कम मंजूर केली आहे.
सर्वोच्च न्यायालय आणि भारत सरकारच्या निर्देशानंतर सरकारचा हा निर्णय समोर आला आहे. अधिवक्ता गौरव बन्सल यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, ज्यांचा कोरोना चाचणीनंतर ते पॉझिटिव्ह येऊन 30 दिवसांच्या आत मृत्यू झाला आहे, असे सर्व लोक कोविड-19 मुळे मृत मानले जातील. अगदी हॉस्पिटलच्या बाहेर मरण पावलेले लोकही यात सामील असतील. याशिवाय कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ज्या लोकांचा आत्महत्येमुळे मृत्यू झाला आहे, त्यांनाही या श्रेणीत ठेवण्यात येणार आहे. (हेही वाचा: मुंबईतील आठ पर्यटन स्थळांवर लहान मुलांना मिळणार कोविड-19 लस; BMC चा मोठा निर्णय, See List)
अशा लोकांच्या मुलांना सानुग्रह अनुदान मिळण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मदतीची रक्कम मिळविण्यासाठीच्या अर्जांची संख्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आणखी वाढू शकते.