Kangana Ranaut Property Demolition Case: मुंबई महापौर आणि पालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा; किरीट सोमय्या यांची मागणी

मुंबई महानगरपालिकेने कंगना रनौत हिच्या घर, कार्यालयावर केलेली तोडक कारवाई बेकायदेशीर असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. भाजप नेत्यांकडून या निर्णयाचे स्वागत होत असून त्यांच्याकडूनक ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

Kangana Ranaut Property Demolition Case: मुंबई महापौर आणि पालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा; किरीट सोमय्या यांची मागणी
Kirit Somaiya | (Photo Credit: kiritsomaiya.com)

मुंबई महानगरपालिकेने (BMC) कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या घर, कार्यालयावर केलेली तोडक कारवाई बेकायदेशीर असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. हायकोर्टाच्या या निर्णयाचे भाजप नेत्यांकडून स्वागत होत असून त्यांच्याकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी देखील ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत संजय राऊत यांची बोलती आता बंद झाली असेल, असे म्हटले आहे. त्याचबरोबर मुंबई महापौर आणि मुंबई पालिका आयुक्त यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "कंगना रनौत मालमत्ता तोडफोड प्रकरणी हायकोर्टाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. मुंबई महापौर आणि मुंबई पालिका आयुक्त यांनी त्वरीत राजीनामा द्यावा. आता संजय राऊत यांची बोलती आता बंद झाली असेल."

Kirit Somaiya Tweet:

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे, याचा विसर या राज्य सरकारला पडला असून उच्च न्यायालयाचा निर्णय हा सरकारला मारलेली सणसणीत चपराक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे- देवेंद्र फडणवीस)

आम्ही जे काही केले ते पालिका नियमांप्रमाणेच केले असे महापौर किशोरी पेडणेकर यांचे म्हणणे आहे. तसंच कोर्टाच्या आदेशाचे मूल्यांकन करण्यासाठी महापौरांनी बीएमसीच्या कायदेशीर पथकासह बैठक आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी कंगनाच्या प्रॉपर्टीच्या झालेल्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी अधिकारी नेमण्यात येणार असून मुल्यांकानुसार तिला नुकसान भरपाई देण्याचे आदेश जारी करण्यात येणार आहेत. या निर्णयावर कंगना रनौत हिने देखील आनंद व्यक्त केला असून लोकशाहीचा विजय झाल्याचे म्हटले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2020 03:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).