महाराष्ट्र राज्य बॅंक घोटाळा प्रकरणी शरद पवार यांच्या ईडी चौकशीची गरज नाही, ईमेल द्वारा निर्णय कळवल्याची नवाब मलिक यांची माहिती
Sharad Pawar ED Enquiry (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र राज्य बॅंक घोटाळा प्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांची आज मुंबईत ईडी कार्यालयात चौकशी होणार होती. मात्र अवघ्या काही मिनिटांपूर्वी शरद पवार यांना ईडी कार्यालयात येण्याची गरज नाही असा इमेल पाठवण्यात आला आहे. या इमेलमध्ये भविष्यात गरज वाटल्यास चौकशीसाठी बोलावू असेही नमूद करण्यात आल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तसेच 'चौकशी करायची नाही मग गुन्हा कुठल्या कारणासाठी दाखल केला? कुणाच्या सांगण्यापूर्वी ईडी काम करत आहे? असा सवाल त्यांनी विचारला आहे. आता दोन वाजता शरद पवार स्वतः ईडी कार्यालयात जाणार का? याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र आता राष्ट्रवादी पक्षाकडून आम्ही ईडी कार्यालयात जाणार असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

सध्या मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे हे पवारांच्या घरी दाखल झाले असून त्यांनी ईडी कार्यालयात न जावं यासाठी मनधरणी करण्यात येत आहे.  शरद पवार यांच्या ED चौकशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून NCP कार्यकर्त्यांची धरपकड; नवाब मलिक म्हणाले, 'ही दडपशाही योग्य नाही'.

मुंबईच्या बलार्ड पिअर भागात ईडी कार्यालयात शरद पवार दुपारी 2 च्या सुमारास पोहचणार असा कार्यक्रम होता. यापार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत सात ठिकाणी जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सातारा, बुलढाणा परिसरात बंद पाळण्यात आला आहे. तर कॉंग्रेसच्या राहुल गांधींनी शरद पवार यांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र सरकार विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहूल गांधी यांनी आपलया ट्वीटच्या माध्यमातून लावला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ED च्या कारवाईवर शरद पवार यांची प्रतिक्रिया; 'तुरूंगवास कधी भोगला नाही पण हा अनुभव घ्यायलाही आवडेल'असं म्हटलं होतं. काल पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी 'आजवर आपण दिल्लीच्या तख्तासमोर कधीच झुकलो नाही. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचे संस्कार आमच्यावर झाले नाहीत. त्यामुळे दिल्लीच्या तख्तासमोर आपण कधीच झुकलो नाही', असे म्हटले होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण काय?

2005 ते 2010 दरम्यान राज्य सहकारी बँकेवर वर्चस्व असणाऱ्या संचालक मंडळांनी नियमबाह्य कर्जाचे वाटप केलले. राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखाने सूतगिरणी मिलप प्र्माणे काही सहकारी संस्थांना कर्जाचं वाटप कले आणि हे कर्ज नियमबाह्य पद्धतीने दिल्याने त्यामध्ये 1500 कोटीहून अधिक रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे आरोप ईडीकडून करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी दिलीपराव देशमुख, ईशरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलवडे, आनंदराव अडसूळ यांच्या नावाचादेखील समावेश आहे. सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वितरणात अनियमितता असल्याचा आरोप या सार्‍यांवर ठेवण्यात आला आहे