पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन कुठेयेत? धनंजय मुंडे यांचा भाजपवर हल्लाबोल
धनंजय मुंडे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2014 रोजी निवडणूकांपूर्वी भाषणे देत जनतेला  मोठ्या आश्वासनांनी बळी पाडल्याचे सांगत भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच मोदींची त्यावेळी भाषणे ऐकून 'गजनी' चित्रपटातील आमिर खानची झलक पाहायला मिळत असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या सभेचे आयोजन विक्रमगड येथे करण्यात आले होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी मोदींवर हल्लाबोल करत त्यांची पूर्वीची आणि आताची भाषणे ऐकून त्यांनी दिलेल्या अच्छे दिनाच्या आश्वासनाचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. तर विक्रमगड येथे ही मोदीसरकारच्या अच्छे दिनाची खिल्ली उडवली जात असल्याचा टोला धनंजनय मुंडे यांनी लगावला आहे. तसेच भक्तांनी जर मोदींना त्यांची 2014 मधील भाषणे ऐकवली तर मोदी प्रचारासाठी बाहेर पडणार नाहीत. मोदी सरकारच्या लाटेमुळे देशाचे, राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शांत न बसता त्यांची जनचा वाट लावणार असे खडे बोल मोदींना धनंजय मुंडे यांनी सुनावले आहेत.

धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी परिवर्तन यात्रेला रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शन घेतल्यानंतर सुरुवात झाली आहे. तसेच या यात्रेचा पहिला टप्पा 10 ते 14 जानेवारी मध्ये पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याला 16 जानेवारी पासून नाशिक येथून सुरु होणार आहे.