Cyber Crimes: इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेच्या ग्राहकांना सायबर गुन्ह्यांपासून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

गावकरी, आदिवासी आणि अशिक्षित लोकांच्या नावाने, फसवणूक करणारे गुन्हेगार बनावट खाती उघडतात आणि खातेदारांना विविध सरकारी योजनांतर्गत आर्थिक लाभ मिळतील असा आभास निर्माण करतात; अशा फसवणूकींच्या अनेक घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे बँक खातेदारांनी अज्ञात व्यक्तींकडे आपले वैयक्तिक तपशील उघड करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खातेदारांना अंधारात ठेवून, विविध सायबर गुन्ह्यांमध्ये, अशा खात्यांचा वापर बेकायदेशीर पध्दतीच्या पैशांच्या व्यवहारांसाठी केला जातो.

आयपीपीबी अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेने यासाठी पुढील सूचना दिल्या आहेत-

  • बँक खाते उघडण्यासाठी ग्राहकांनी कोणत्याही तिऱ्हाईत व्यक्तीचा मोबाइल नंबर वापरू नये.
  • ग्राहकांनी व्यवहाराची खरी माहिती न घेता कोणतेही पैसे स्वीकारू नयेत किंवा पाठवू नयेत.
  • ग्राहकांनी आपल्या खात्यातील बँकव्यवहार नियंत्रित करण्यासाठी त्यांचे मोबाईल बँकिंग तपशील त्यांच्या वतीने अज्ञात व्यक्तींसोबत शेअर करु नयेत.
  • ग्राहकांना त्यांच्या आयपीपीबी खात्याचे तपशील, नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या लोकांसोबत किंवा सोशल मीडियाद्वारे सहज पैसे कमावण्याची संधी देणार्‍या लोकां सोबत शेअर करू नयेत.
  • ग्राहकांनी व्यवहार करण्यापूर्वी किंवा पैसे पाठवण्यापूर्वी कंपनी आणि व्यक्तीची पडताळणी करावी.

आयपीपीबी ग्राहकांच्या ओळखी संदर्भातली  माहिती पोस्टात खाते उघडल्यानंतर वेळोवेळी अद्ययावत करते आणि अशा फसवणूक करणार्‍यांकडून त्यांचा गैरवापर होण्यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या व्यवहारांचे निरीक्षण देखील केले जात असते. (हेही वाचा: मुंबईतील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी रस्त्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता असणारे कॅमेरे बसवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती)

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेबद्दल:

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या टपाल विभागाची भारत सरकारच्या  100% इक्विटीसह स्थापन करण्यात आलेली बॅंक आहे. भारतातील सर्वसामान्यांसाठी सर्वात सुलभ, परवडणारी आणि विश्वासार्ह बँक उभारण्याच्या दृष्टीकोनातून दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बँकेची स्थापना करण्यात आली आहे.