
Shiv Jayanti Shivgarjana in Marathi Text: छत्रपती शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं तरीही छाती अभिमानाने फुगते. महाराष्ट्राच्या मातीतील सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) . ते असे गरजले की 395 व्या जयंतीच्या वेळीही केवळ आणि केवळ त्यांच्याच नावाचा उद्घोष आहे. गड आणि दुर्ग दणाणून सोडणारा, सिंहासारखा निधड्या छातीचा, शौर्य आणि पराक्रमाची आणि दूरदृष्टीची यशोगाथा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
सुसंस्कारी, युद्धशास्त्रात निपुण, उत्तम राजकारणी, न्यायशास्त्र पारंगत, प्रजाहितदक्ष राज्यकारभारी छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत. जवळजवळ साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरीच्या बंधनातून प्रजेची मुक्तता करून, हिंदवी स्वराज्यात सुख आणि शांतीने जगण्याचा अधिकार देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी गडावर झाला. आई जिजाबाई यांच्या पदराखाली वाढलेल्या महाराजांना संस्कारांचे, अध्यात्माचे, शिक्षणाचे बाळकडू घरीच मिळाले होते. (हेही वाचा: Shiv Jayanti 2025 HD Images: मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त Wishes, WhatsApp Status, Images, Messages च्या माध्यमातून द्या शिवजयंतीच्या शुभेच्छा)
तर आपण अनेक ठिकाणी पाहिले असेल, ऐकले असेल की शिवाजी महाराजांच्या जयघोषासाठी एक खास घोषणा किंवा ललकारी दिली जाते. हिला शिवगर्जना असे म्हणतात. या शिवगर्जनेमध्ये शिवरायांसाठी अनेक बिरुदे वापरलेली आहेत.
पहा शिवगर्जना (Shivgarjana in Marathi)-
आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम
महाराsssssज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.
जाणून घ्या शिवगर्जनेचा मराठीमध्ये अर्थ-
गजअश्वपती- ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोडदळ आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचे प्रतिक समजले जायचे. म्हणुन गजअश्वपती हा शब्द वैभवसंपन्नतेचे प्रतीक होते असे म्हणता येईल)
भूपती प्रजापती- वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण आणि पालन करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.
सुवर्णरत्नश्रीपती- राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवराय हे 32 मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती होते)
अष्टावधानजागृत- आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.
अष्टप्रधानवेष्टीत- ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज.
न्यायालंकारमंडीत- कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या बाजुने व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत- सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज. महाराज शस्त्राविद्या पारंगत होतेच त्याबरोबर राजांनी शास्त्र सुद्धा पारंगत केले होते.
राजनितीधुरंधर- आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज.
प्रौढप्रतापपुरंदर- मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.
क्षत्रियकुलावतंस- क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.
सिंहासनाधिश्वर- जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच 32 मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज. राजांनी राज्याभिषेकसाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवून घेतले होते.
महाराजाधिराज- विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.
राजाशिवछत्रपती- ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.
दरम्यान, महाराजांनी लष्करी कारभाराची व्यवस्था डोळसपणे आखली होती. त्यांचे स्वतःचे चारित्र्य निष्कलंक, स्वच्छ होते. महाराजांच्या मनात स्त्रियांबद्दल आदर होता. शुद्ध मन, सद्भावना, सरळ स्वभाव हे त्यांचे विशेष गुण होते. प्रजेच्या सुखाचा नेहमी विचार करणारा व दुःखाचा विनाश करणारा हा लोकनायक होता.
दादोजी कोंडदेव यांच्या हाताखाली ते सर्व प्रकारच्या युद्धशास्त्रात पारंगत झाले. लहानपणापासूनच त्यांना धर्म, संस्कृती आणि राजकारण याबाबत योग्य ते शिक्षण मिळत गेले. स्वराज्याची संकल्पना शिवरायांनीच प्रथम मांडली. मित्रांची एक फौज तयार करून त्यांनी अवघ्या सोळाव्या वर्षी तोरणा गड जिंकला व तिथेच अखंड स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे त्यांनी प्रचंड धाडस, आत्मविश्वास, प्रसंगावधान, गनिमी काव्याच्या जोरावर 300 हून अधिक किल्ले जिंकले.
शत्रूचा बीमोड करण्यासोबतच त्यांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. स्वराज्याचा विस्तार होत होता. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. महाराजांच्या राज्यात प्रजेला न्याय मिळू लागला व अपराध्यांना शासन होऊ लागले. पुढे 1774 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला व ते मराठा साम्राज्याचे शासक बनले.