'ठाकरे सरकार स्वतःचं अपयश झाकण्यासाठी सामान्यांना शिक्षा देत आहे'; लॉकडाऊन वरुन निलेश राणे यांची टीका
Nilesh Rane (Photo Credits: Twitter)

राज्यातील कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधासह विकेंड लॉकडाऊन सरकारकडून लागू करण्यात आला आहे. तसंच काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पूर्ण लॉकडाऊनचा संकेत ठाकरे सरकारकडून देण्यात आला आहे. यावरुन भाजप नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकार स्वत:च्या चुकीची शिक्षा सामान्य जनतेला देत असल्याचे निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये लिहिले, "ठाकरे सरकारचा पहिला उपाय पण लॉकडाऊन आणि शेवटचा उपाय पण लॅाकडॉऊन. आता म्हणतात कोरोनाची साखळी तोडायची आहे मग मधले काही महिने साखळी तुटली होती तेव्हा अंगठा का चोखत बसले?? स्वतःचं अपयश झाकण्याची शिक्षा सामान्य जनतेला का देताय??"

Nilesh Rane Tweet:

काही महिने कोरोनाची साखळी तुटली होती तेव्हा इतर उपाययोजना, सुविधा निर्माण करण्याऐवजी सरकार काय करत होतं? असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसंच लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताच उपाय ठाकरे सरकारकडे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  यापूर्वी देखील निलेश राणे यांनी पुण्यातील निर्बंधांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. लॉकडाऊन करुन महाराष्ट्राची वाट लागू नका, असे त्यांनी म्हटले होते.