'आम्हाला पक्ष सोडून गेलेल्यांची चिंता नाही' - महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला राज्यात सत्तांतराचा निर्धार
Congress Leader Balasaheb Thorat with Rahul Gandhi (Photo Credit: Twitter/bb_thorat)

महाराष्ट्राच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षामध्ये करण्यात आलेली खांदेपालट महत्त्वाची ठरणार आहे. 13 जुलैच्या रात्री बाळासाहेब थोरातांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर आज त्यांनी अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली. 'प्रदेशाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी आहे, तसेच आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये आघाडीचं सरकार येणार' असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगरमध्ये कॉंग्रेस पक्षाचा अजेंडा स्पष्ट करताना बाळासाहेब थोरात यांनी आमच्या पक्षातून काही लोक गेले पण जेव्हा एखादी व्यक्ती पक्ष सोडते तेव्हा त्याच्या जागी नव्या चेहर्‍याला संधी मिळून नवं नेतृत्त्व तयार होत असतं. म्हणूनचा आम्हाला गेलेल्या लोकांची चिंता नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 'एकदिलाने काम करून महाराष्ट्रात सत्तांतर घडवू' असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती; पाच कार्याध्यक्षांचीही निवड, सुशील कुमार शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी

कॉंग्रेस पक्षाकडून अधिकृत घोषणा

लोकसभेमध्ये कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधींसह अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे जमा केले आहेत. महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदी असलेल्या अशोक चव्हाणांनीही आपला राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस पक्षाने आता बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सोबतच नितीन राऊत, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, विश्वजीतक कदम आणि मुझफ्फर हसन या पाच कार्याध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे.