Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद हायवेवर भीषण अपघात, कुटुंबातील चार जणांचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad Highway) दापचरी येथे एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर बनली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी त्यांची गाडी रोड दुभाजकाला धडकली आणि मुंबई (Mumbai)-अहमदाबाद (Ahmedabad) महामार्गावरील समोरील लेनवर पलटी झाली. जिल्हा पोलिस प्रवक्ते सचिन नवाडकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील (Palghar District) दापचरीजवळ सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ही गाडी गुजरातकडे जात असताना हा अपघात झाला. भरधाव गाडी पहिले दुभाजकावर आदळकु आणि नंतर समोरच्या लेनवर पलटी झाली, असे ते म्हणाले. प्रवक्त्याने सांगितले की, जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि अपघातग्रस्तांची अद्याप ओळख पटलेली नाही.

दरम्यान, शुक्रवारी दिवसभरातील हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी, पुणे-बंगळुरू महामार्गावर साताऱ्याजवळ भरधाव कारनं तीन दुचाकींना टक्कर मारली ज्यात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. वळसे (ता.सातारा) गावाजवळ सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये एकाचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असल्याने महामार्गावर वाहनांची संख्या दिवसेंदवस वाढताना दिसत आहे. यासह मागील काही दिवसांमध्ये अपघातांचे प्रमाणही वाढलं आहे.