National Science Day 2020: 'राष्ट्रीय विज्ञान दिन' निमित्त जाणून घ्या चंद्रशेखर वेंकट रामन यांचा जीवन परिचय
Chandrashekhara Venkata Raman (PC - getty)

National Science Day 2020: भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. सामान्य जनमानसात विज्ञानाबद्दल जागृती वाढावी, विज्ञानाचा शांततेसाठी आणि विकासासाठी वापर व्हावा, हा यामगचा उद्देश असतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी चंद्रशेखर वेंकट रामन (Chandrashekhara Venkata Raman) यांनी भारतातील रामण परिणामाचा शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. वैज्ञानिक, संशोधक तसेच देशातील सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

चंद्रशेखर वेंकट रामन यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं आहे. तसेच 1954 मध्ये रामन यांना 'भारतरत्न' आणि 1957 मध्ये लेनिन शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सी. व्ही. रामन यांचा जन्म तिरुचिरापल्ली येथे 7 नोव्हेंबर 1888 मध्ये झाला. रामन यांनी चेन्नई येथून आपलं शिक्षण पूर्ण केलं. सी. व्ही रामन यांनी 1917-1933 या काळात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर 1947 साली रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले. रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅचरिंग) यासाठी ते ओळखले जाऊ लागले. (हेही वाचा - Marathi Rajbhasha Din 2020: मराठी राजभाषा दिन कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त का साजरा केला जातो?)

National Science Day 2020 (PC - twitter)

1986 मध्ये ‘नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन’मार्फत (एनसीएसटीसी) विज्ञानाचा प्रचार-प्रसार व्हावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली. त्यानंतर विज्ञान दिन कोणता दिवशी साजरा करण्यात यावर चर्चा करण्यात आली आणि 28 फेब्रुवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. कारण या दिवशी सी. व्ही. रामन यांनी त्यांचा ‘रामन इफेक्ट’ हा प्रसिद्ध शोध जाहीर केला होता. त्यांच्या या शोधामुळे त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते. केंद्र सरकारने या दिवसाला मान्यता दिल्याने 1987 पासून हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी वेगवेगळे अविष्कार सादर करत असतात. विज्ञानाची कास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो.