Lok Sabha Elections 2019: राहुल गांधी यांनी दिला नाही 'आप'ला हात, दिल्लीत काँग्रेस स्वबळावर
Rahul Gandhi and Arvind Kejriwal | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Lok Sabha Elections 2019: राजधानी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष (National Congress Party) यांच्यात आघाडी होणार की नाही याबाबत अनेक चर्चा, तर्क वितर्क आणि उत्सुकतेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात कोणत्याही प्रकारची आघाडी होणार नाही. आम आदमी पक्षासोबत आघाडी करायची किंवा नाही याबबात चर्चा करण्यासाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी पक्षनेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शिला दीक्षित (Sheila Dikshit) यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होणार किंवा नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना शिला दिक्षित म्हणाल्या. पक्षाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली बोलावलेल्या बैठकीत सर्वानुमते आपसोबत आगाडी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम आदमी पक्षाने काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले होते. मात्र, दिल्लीतील काँग्रेस नेते त्याविरोधात होते. शिला दिक्षित यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पीसी चाको यांनीही आपसोबत आघाडी होणार नसल्याच्या वृत्ताला दुजोरा देत दिल्लीमध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे.

आम आदमी पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस हे 3 -3 जागांवर निवडणूक लढतील तर एक जागा अपक्षासाठी सोडतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांची मोठ बांधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यात काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस पक्षामध्येही कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला असून, काँग्रेस नेतृत्वाने भाजपवर जोरदार प्रहार करण्यास सुरुवात केली आहे. (हेही वाचा, 6 मार्च रोजी होणार भाजप आणि AIADMK-PMK यांच्या युतीबाबत बैठक,पंतप्रधान नरेंद्र मोदी लावणार उपसस्थिती)

दरम्यान, देशभरातील अनेक राज्यांमध्ये काँग्रेसने मुख्य भूमिका निभावत प्रादेशिक पक्षांनाही सोबत घेतले आहे. वेळप्रसंगी नमते घेत मित्रपक्षांना अधिक जागा सोडण्याची लवचिकताही काँग्रेस नेतृत्वाने दाखवली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसची आघाडी कसे यश मिळवते याबातब उत्सुकता आहे.