ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजपा पक्षप्रवेश; कॉंग्रेसवर गंभीर आरोप तर PM नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित असल्याच्या व्यक्त केल्या भावना
Jyotiraditya Scindia (Photo Credits: Twitter/ ANI)

कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी आज दिल्लीमध्ये भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये  भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) प्रवेश केला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस पक्षावर, कमलनाथ यांच्या सरकारवर नाराज असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस पक्षाची साथ सोडली. गांधी कुटुंबिय आणि कॉंग्रेस पक्षाच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ पसरली होती. मात्र आज अखेर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून सार्‍या चर्चांना पूर्णविराम लावले आहे. दरम्यान काल (10 मार्च) सकाळी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या भेटीनंतर सिंधिया भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान आता संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर मोदी सरकारमध्ये ज्योतिरादित्य यांचा समावेश होऊ शकतो. दरम्यान भाजपाकडून त्यांना राज्यसभेवर पाठवणी केली जाऊ शकते अशा चर्चा रंगल्या आहेत. MP Political Crisis: ग्वाल्हेरच्या शिंदे कुटुंबाची राजकीय वाटचाल, राजमाता ते आजचे ज्योतिरादित्य सिंधिया

दरम्यान भाजपापक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. यावेळेस त्यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे. 18 महिन्यात अजून शेतकर्‍यांची कर्ज   माफ केली नाही. दरम्यान मध्य प्रदेशात सरकारमध्ये भ्रष्टाचार असल्याचे आरोप केले आहेत. मोदी हे क्षमता असलेले पंतप्रधान आहेत असं म्हणत त्यांचं कौतुक करताना भारताचं भविष्य त्यांच्या हातात सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. 18 वर्ष कॉंग्रेससोबत निष्ठेने काम केले मात्र पक्षातील अंतर्गत गोष्टींना कंटाळून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देताना त्रास झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काल दुपारी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपण कॉंग्रेस पक्षामध्ये राहून देशाची सेवा करू शकत नाही असं म्हटलं होतं. ट्वीटच्या माध्यमातून सिंधिया यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सोडचिट्ठीची घोषणा केल्यानंतर तो कॉंग्रेसकडून तात्काळ मंजुरदेखील करण्यात आला. त्यानंतर कॉंग्रेस नेत्यांकडून ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या या राजकीय खेळीला 'गद्दारी' म्हणण्यात आलं होतं.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसला मध्य प्रदेशात सरकार गमवण्याचीदेखील नामुष्की आली आहे. सिंधिया यांच्यासोबत सुमारे 22 समर्थकांनी राजीनामा धाडल्याने कमलनाथ सरकार अल्पमतामध्ये आले आहे.