तुमचं मत हेच तुमचं शस्त्र, योग्य मुद्द्यांवर विचारपूर्वक निर्णय घ्या: प्रियंका गांधी
प्रियंका गांधी (Photo Credits: Twitter@INC)

LokSabha Elections 2019: आपले मत हेच आपले शस्त्र आहे. योग्य मुद्दे निवडा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या,असे सांगत प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) उपस्थितांना साद घातली. काँग्रेस पक्ष महासचिव पदाची जबाबदारी स्वीकारत जाहीर राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रियंका गांधी यांची गांधी कुटुंबीयांसोबतची ही पहिलीच जाहीर सभा होती. या सभेला प्रियंका गांधी यांनी आपल्या खास भाषणशैलीत संबोधीत केले. माजी पंतप्रधान मनमोनहन सिंह हेसुद्धा या वेळी उपस्थीत होते. दरम्यान, या वेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा राफेल डील, पुलवामा हल्ला आदी विषयांवरुन भाजप आणि मोदी सरकारवर (Modi Govt.) हल्लाबोल केले.

प्रियंका गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मी साबरमती येथे जाऊन आले. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर माझ्या मनातील भावना जागृत झाल्या. मला क्षणभर वाटले की, मला अश्रू येणार आहेत. महात्मा गांधी यांच्या बलीदानातून उभा राहिलेला आहे. हा देश प्रेम, सद्भावना आणि आपापसातील प्रेमाच्या आधारावर बनलेला आहे. सत्य समोर येईल तेव्हा देशातील द्वेशाची हवा प्रेम आणि करुणेत बदलेल असा विश्वास प्रियंका गांधी यांनी व्यक्त केला. (हेही वाचा, चौकीदार चिडले, राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाईची मागणी; ‘चौकीदार चोर है' विधानावर आक्षेप)

आज देशामध्ये जे सुरु आहे ते पाहून दु:ख होते. आपण जागृत बना, आपली जागरुकता हेसुद्धा एक मोठे हत्यार आहे. आपले मत हेसुद्धा एक शस्त्रच आहे. हे एक असे शस्त्र आहे, ज्याच्या जोरावर तुम्ही कोणालाही इजा, दु:ख किंवा हानी न पोहोचवता स्वत:ला मजबूत बनवू शकता. ही निवडणूक काय आहे? ही निवडणूक केवळ निवडणूक नाही, आपण आपले भविष्य ठरवणार आहात. त्यामुळे योग्य तोच निर्णय घ्या, असे प्रियंका गांधी यांनी उपस्थितांना सांगितले.

दरम्यान, या वेळी बोलताना प्रयंका गांधी म्हणाल्या, निवडणूक प्रचारादरम्यान, तोच मुद्दा हाती घ्या जो तुम्हाला पुढे घेऊन जाईल. महिला, युवक, शेतकरी, कामगार या वर्गासाठी काय करता येऊ शकेल असे मुद्दे घ्या. असेही प्रियंका गांधी यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा चौकीदार चोर है हा नारा दिला. राहुल गांधी म्हणाले की, फक्त चौकीदार म्हणा त्याच्या पुढे बोलण्याची आवश्यकताच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबानी यांना 30 हजार कोटी रुपये दिले. अनिल अंबानी हे कागदाचे विमानही बनवू शकत नाहीत. राफेल खरेदीची चौकशी व्हायला हवी असेही गांधी या वेळी म्हणाले.