Coronavirus in India: देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने ओलांडला 19 लाखांचा टप्पा; 52,509 नव्या रुग्णांसह  857 मृतांची नोंद
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट भारतावर घोंगावत आहे. अद्याप लस किंवा ठोस औषध उपलब्ध न झाल्याने कोरोना बाधितांचा आकडा शून्यावर आणणे शक्य झालेले नाही. त्यामुळे दिवसागणित रुग्ण संख्या वाढत असून अनेक रुग्ण कोरोनामुक्तही होत आहेत. मागील 24 तासांत देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत 52,509 इतकी मोठी भर पडली असून 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या भरीमुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 19 लाखांचा टप्पा पार केला आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 19,08,255 वर पोहचला आहे. त्यापैकी 5,86,244 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 12,82,216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोना संसर्गामुळे देशात एकूण 39,795 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू येथे कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहायला मिळत आहे. मात्र कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या चांगली असल्याने रिकव्हरी रेट सुधारत आहे. दरम्यान कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोना व्हायरस संकटाने संपूर्ण जगाला जेरीस आणले आहे. त्यामुळे कोविड-19 लसीच्या विकासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. (येथे पहा मुंबईतील कोविड-19 रुग्णांची आकडेवारी)

ANI Tweet:

कोविड-19 चे संकट कायम असल्यामुळे काही राज्यांमध्ये लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर आजपासून अनलॉक 3 ला सुरुवात होत आहे. अनलॉक 3 अंतर्गत नियमांत शिथिलता आणत अनेक सोयी-सुविधा सुरु करण्यात येत आहेत. दरम्यान कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.