
अखेर ममता दीदींच्या (Mamata Banerjee) पश्चिम बंगालला (West Bengal) भाजपने (BJP) खिंडार पाडले आहे. 2014 च्या निवडणुकीवेळी अवघ्या 2 जागा जिंकणारा भाजप बंगालमध्ये आता 17 जागांवर आघाडीवर आहे. तृणमूल (TMC) 24 जागांसह भाजपपेक्षा फक्त 7 जागांवर आघाडीवर आहे. संध्याकाळपर्यंत असेच चित्र राहिले तर, सरकार बनवण्यासाठी ममता दीदींना फार मोठे आव्हान उभे राहणार आहे. गेली इतके वर्षे पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पार्टी आणि तृणमूलची एक हाती सत्ता होती. मात्र आता पहिल्यांदाच भाजप इतक्या मोठ्या संख्येनी आघाडीवर आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. यावर्षी या राज्यात विक्रमी मतदान झाले आहे. मतदानाआधी मोदींच्या भाषणाला परवानगी देण्यापासून ते रॅली काढण्यापर्यंत प्रत्येक वेळी भांडणे आणि हिंसाचार उफाळला होता. तरी इथल्या जनतेने सर्वाधिक मते देऊन आपला हक्क बजावला.
(हेही वाचा: महाराष्ट्रातून कॉंग्रेस हद्दपार? भाजप-शिवसेना तब्बल 43 जागांवर आघाडीवर, कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे फक्त 4 जागा)
एक्झिट पोलनुसार, पश्चिम बंगालच्या 42 लोकसभा जागांपैकी भाजप 19 ते 23 जागा जिंकू शकेल. सत्तारूढ तृणमूल काँग्रेस (TMC) यांना केवळ 19 ते 22 जागा मिळतील. तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. आता मूळ निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.