
Heat Wave Alert: देशात उष्णतेचा प्रभाव तीव्र झाला असून हवामान खात्याने दिल्लीसह 9 राज्यांमध्ये 5 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat Wave Alert) दिला आहे. यामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. या राज्यांमध्येही तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी या राज्यांतील अनेक शहरांतील तापमान 43 ते 46 अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे कमाल तापमान 46.9 अंशांवर पोहोचले. याशिवाय आज ओडिशा, झारखंड, गोवा, आसाम आणि त्रिपुरामध्ये उष्णतेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दुसरीकडे, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून पाच दिवस तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडेल. त्याच वेळी, कर्नाटकात दोन दिवसांनी म्हणजे 20 मे पासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा -Monsoon Update: आनंदाची बातमी! मॉन्सून दक्षिण अंदमानमध्ये दाखल, यंदा सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज)
तामिळनाडूमध्ये शुक्रवारीही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तामिळनाडूच्या एसडीआरएफच्या पथकाने पूरस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा ही टीम चेन्नईहून तिरुनेलवेलीला पोहोचली. जिल्ह्यातील सखल भागात मुसळधार पावसाचा सामना करण्याची तयारी सुरू आहे. (हेही वाचा - Chiplun Rains: चिपळूण मध्ये अडरे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस; मे महिन्यात अर्धा तासात दुथडी भरून वाहल्या नद्या !)
केरळ-कर्नाटकात पाऊस पडणार -
IMD ने केरळमधील मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि इतर आठ जिल्ह्यांमध्ये 18 ते 20 मे दरम्यान पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. लोकांना 21 मे पर्यंत समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय जोरदार वादळाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
IMD ने 17 ते 21 मे दरम्यान कर्नाटकातील शिवमोग्गा, चिक्कमगालुरू, कोडागु, हसन, म्हैसूर, मंड्या, चामराजनगर, उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 18 मे रोजी कोडागु, हसन, म्हैसूर, मंड्या आणि तुमुकुरू जिल्ह्यांमध्ये 40-50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग असेल, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.