Diwali 2021: यंदाच्या दिवाळीत भारताचा चीनला मोठा झटका; ड्रॅगनचे होऊ शकते तब्बल 50,000 कोटींचे नुकसान
Crawford Market (Photo Credits-ANI)

दिवाळी (Diwali 2021) आणि इतर सणांच्या आधी भारतात चिनी (China) वस्तूंचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने म्हटले आहे की भारतीयांनी देशांतर्गत बाजारपेठेत चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यामुळे, यावर्षी चीनी निर्यातदारांचे अंदाजे 50,000 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. भारतीय लोक या सणासुदीच्या दिवसात चीनमधून येणारे फटाके आणि इतर स्वस्त उत्पादनांवर बंदी घालत आहेत. चीनसाठी हे सामान थेट भारताच्या देशांतर्गत उद्योगांसाठी अधिक नफ्याचे समान आहे.

शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात, व्यापार्‍यांच्या संघटनेने म्हटले आहे की, सणासुदीच्या अगोदर देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची संख्या वाढल्याने या दिवाळीत भारताच्या देशांतर्गत विक्रीत मोठी वाढ अपेक्षित आहे. दिवाळीच्या विक्रीदरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटींची आवक दिसू शकते. CAIT ने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील CAIT ने 'चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे' आवाहन केले आहे.

CAIT चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, संस्थेच्या संशोधन शाखेने 20 'वितरण शहरां'मध्ये नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, आतापर्यंत चीनी निर्यातदारांना भारतीय व्यापारी किंवा आयातदारांकडून दिवाळीच्या वस्तू, फटाके किंवा इतर वस्तूंची ऑर्डर देण्यात आलेली नाही. ही 20 शहरे- नवी दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, नागपूर जयपूर, लखनौ, चंदीगड, रायपूर, भुवनेश्वर, कोलकाता, रांची, गुवाहाटी, पाटणा, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, मदुराई, पाँडेचेरी, भोपाळ आणि जम्मू अशी आहेत. (हेही वाचा: Island of Gold: इंडोनेशियातील मच्छिमारांना सापडले 700 वर्षांपूर्वी गायब झालेले 'सोन्याचे बेट'; हाती लागला अब्जावधींचा खजिना)

दरवर्षी रक्षाबंधनपासून पुढील पाच महिन्यांच्या सणासुदीच्या हंगामात, भारतीय व्यापारी आणि निर्यातदार चीनमधून सुमारे 70,000 कोटी रुपयांच्या वस्तूंची आयात करतात. यंदा रक्षाबंधन दरम्यान 5 हजार कोटी आणि नंतर गणेश चतुर्थीला 500 कोटी रुपयांचे नुकसान चीनला झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षीही दिवाळीच्या काळात देशभरात सुमारे 72 हजार कोटींचा व्यवसाय झाला होता आणि त्यावेळी चीनला सुमारे 40 हजार कोटींचे नुकसान झाले होते.