IND vs BAN 1st Test Day 2: मयंक अग्रवाल याच्या दुहेरी शतकानंतर टीम इंडियाची आघाडी, दुसऱ्या दिवशी भारताचा स्कोर 493/6
मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे (Photo Credit: IANS)

इंदोरमध्ये भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांग्लादेशच्या पहिल्या डावातील धावासंख्या मागे टाकले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 114 षटकांत 6 गडी गमावून भारताने 493 धावा केल्या आहेत. आणि बांग्लादेशविरुद्ध 343 धावांची आघाडी मिळवली. टीम इंडियासाठी सलामी फलंदाज मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) 330 चेंडूत 243 धावा करून बाद झाला. मयंकने वीरेंद्र सेहवागच्या शैलीत 303 चेंडूत एका षटकारासह दुसरे द्विशतक पूर्ण केले. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशचा डाव 150 धावांवर संपुष्टात आला आणि त्यानंतर भारताने फलंदाजी करताना केवळ एक गडी गमावले होतो. दुसऱ्या दिवशी संघाने 5 गडी गमावले. बांग्लादेशकडून अबू जायद (Abu Jayed) याने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. इबादत हुसेन (Ebadat Hossain)आणि मेहिदी हसन (Mehidy Hasan) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. (IND vs BAN 1st Test Day 2: मयंक अग्रवाल याने षटकार मारत ठोकले दुसरे दुहेरी टेस्ट शतक)

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा चेतेश्वर पुजारा यानेफक्त 68 चेंडूत आपल्या कसोटी कारकीर्दीतील 23 वे अर्धशतक ठोकले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पुजाराने मयंकच्या साथीने चांगली भागीदारी केली, पण पुजारा लगेच चौकार लगावत 54 धावांवर माघारी परतला. जायदने पुजाराला सैफ हसनच्या हाती कॅच आऊट केले. त्याच्यानंतर कर्णधार विराट कोहली जाएदच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने मयंकला चाली साथ दिली. दोघांनी 190 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. रहाणेने अर्धशतक केले पण शतक पूर्ण करण्याआधी 86 धावांवर कॅच आऊट झाला.

याच्यानंतर मयंकने टेस्ट करिअरमधील दुसरे द्विशतक केले. मयंकने टेस्टमधील चांगला फॉर्म कायम ठेवत सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. यापूर्वी मयंकने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात पहिले दुहेरी शतक केले होते. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत बांग्लादेश संघाला अवघ्या 150 धावांवर ऑल आऊट केले. बांग्लादेशचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही.