IPL 2022, No-Ball Controversy: नो-बॉल वादावर शेन वॉटसन यांनी आपल्याच संघाला फटकारले, Rishabh Pant-प्रवीण अमरेची घेतली शाळा; पाहा काय म्हणाले
शेन वॉटसन आणि ऋषभ पंत (Photo Credit: Twitter)

IPL 2022, No-Ball Controversy: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capital) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील आयपीएल (IPL) 2022 चा 34 वा सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सामन्यातील दिल्लीच्या डावाच्या 20व्या षटकात मैदानावरील पंच नितीन मेनन (Nitin Menon) यांनी एका चेंडूला नो-बॉल दिला नाही. या सामन्यात दिल्लीला 15 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पंचाच्या नो बॉल न देण्याच्या निर्णयाने दिल्ली कॅपिटल्सचे संपूर्ण कॅम्प चांगलेच संतापले होते. अंपायरच्या या निर्णयानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) इतका संतापला की त्याने रोवमन पॉवेल (Rovman Powell) आणि कुलदीप यादव या दोन्ही फलंदाजांना क्रीज सोडून परत येण्यास सांगितले. अनेकवेळा नकार देऊनही पंत निर्णय मानायला तयार नव्हता. पण त्यानंतर दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन (Shane Watson) यांनी पंतची समजूत काढली आणि त्यानंतर कर्णधार शांत झाला. यानंतर पुन्हा सामना सुरू झाला तेव्हा पॉवेलने आपली लय गमावली होती. (IPL 2022, DC vs RR: अंतिम षटकात ‘हायव्होल्टेज ड्रामा’, कर्णधार Rishabh Pant ने फलंदाजांना मॅच सोडून डगआउटमध्ये परतण्याचे दिले संकेत)

दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसन म्हणाले की, (आयपीएल) मधील राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातील शेवटच्या षटकात जे घडले त्याला संघ समर्थन करत नाही आणि खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाचे पालन केले पाहिजे व एखाद्याने मैदानात जाणे पूर्णपणे ‘अस्वीकार्य’ आहे. शेवटच्या षटकात ओबेड मॅकॉयच्या तिसऱ्या चेंडूवर पॉवेलने षटकार ठोकला तेव्हा ही घटना घडली. दिल्लीचा संघ फुल्ल टॉस चेंडूवर नो-बॉलची मागणी करायला लागला. अशा स्थितीत नॉन स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या कुलदीप यादवने अंपायरकडे बोट दाखवत रिप्ले पाहण्यास सांगितले कारण तो कमरेच्या वर असता तर नो-बॉल होऊ शकला असता. पॉवेलने पंचांशी बोलण्यासही सुरुवात केली, परंतु मैदानावरील पंचांनी चेंडू वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर कर्णधार पंतने पॉवेल आणि कुलदीपला परतण्यास सांगितले. यादरम्यान, दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे मैदानात उतरले.

वॉटसन सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला, “त्या शेवटच्या षटकात जे घडले ते खूप निराशाजनक होते. दिल्ली कॅपिटल्स शेवटच्या षटकात जे घडले त्याचे समर्थन करत नाही. पंचाचा निर्णय योग्य असो वा अयोग्य, तो आपल्याला मान्य करावा लागतो. कोणी मैदानावर जाणे मान्य नाही. एकंदरीत ते चांगले गेले नाही.” पंचांच्या निर्णयावर पंत चिडलेले दिसला. त्याने कुलदीप आणि पॉवेलला परत बोलावले, त्याचवेळी वॉटसन त्याला समजावताना दिसले. अशा परिस्थितीत खेळ सुरू ठेवला पाहिजे आणि पंचांचे ऐकले पाहिजे, असे माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने सांगितले.