IND vs ENG 3rd Test Day 1: लीड्सवर इंग्लंड गोलंदाजांचा तिखट मारा, भारताची पहिल्या डावात फक्त 78 धावांपर्यंत मजल
इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test Day 1: इंग्लंड (England) आणि भारत (India) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले (Headingley) मैदानावर खेळला जात आहे. सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत भारताचा फलंदाजीक्रम गडगडला आणि पहिल्या डावात 40.4 ओव्हरमध्ये फक्त 78 धावाच करू शकला. भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) 105 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 19 धावा केल्या तर कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 18 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, वेगवान इंग्लिश गोलंदाजांनी सुरुवातीपासून भारतीय फलंदाजांवर दबदबा कायम ठेवला आणि भारतीय फलंदाजांवर वेसण घातले. इंग्लंडसाठी जेम्स अँडरसन (James Anderson) आणि क्रेग ओव्हरटन (Craig Overton) यांनी प्रत्येकी 3 विकेट्स काढल्या तर ओली रॉबिन्सन व सॅम कुरन यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाली. भारताने 1-0 ने आघाडी घेतल्याने इंग्लंडवर विजय मिळवण्याचे दडपण आहे. (IND vs ENG 3rd Test: जेम्स अँडरसनने विराट कोहलीला स्वस्तात धाडले माघारी, उत्साही इंग्लिश चाहत्यांनी असा दिला Send-Off, व्हिडिओ झाला व्हायरल)

लीड्सच्या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर अँडरसनने केएल राहुलला विकेट्सच्या मागे जॉस बटलरकडे झेलबाद केले. राहुलला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर पुजारालाही अँडरसनने 5व्या ओव्हरमध्ये बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. पुजारा 1 धाव करुन माघारी परतला. चौथ्या स्थानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीलाही फार वेळ अँडरसनने मैदानावर टिकून दिले नाही. विराट 17 चेंडूत 7 धावा करुन 11 व्या षटकात बटलरकडेच झेलबाद झाला. यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने रोहित शर्माला चांगली साथ दिली होती. या दोघांनी चांगली भागीदारी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भागीदारी रंगत असतानाच ऑली रॉबिन्सनने 26 व्या षटकात रहाणेला बटरलकडेच झेलबाद करून पहिल्या सत्राअखेर 18 धावांवर पॅव्हिलियनमध्ये धाडले.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला रॉबिनसनच्या चेंडूवर बटलरने पंतचा झेल घेत भारताला पाचवा झटका दिला. पंत पाठोपाठ सुरुवातीपासून मैदानावर टिकलेला भारताचा सलामीवीर रोहित बाद झाला. आणि मोहम्मद शमी एकाच ओव्हरमध्ये तंबूत परतले. ओव्हरटनने दोघांची विकेट घेत भारताचे सात गडी तंबूत धाडले. रोहितबाद झाल्यानंतर एक एक फलंदाज बाद होत गेले. जाडेजा, बुमराह आणि शमी यांच्या बाद होण्याने भारताची अवस्था बिकट झाली. ओव्हरटनने सिराजचा अडथळा दूर करत भारताचा डाव संपुष्टात आणला.