ICC WTC Final 2021: ‘या’ 3 कारणांमुळे फायनलमध्ये न्यूझीलंड टीम इंडियावर ठरू शकतो वरचढ, Lord's टेस्ट सामन्यानंतर किवी संघाची ताकद आली समोर
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

ICC WTC Final 2021: गुरुवारी इंग्लंडमध्ये (England) दाखल झाल्यानंतर विराट कोहलीच्या  (Virat Kohli) भारतीय संघाने (Indian Team) बाहेर प्रशिक्षण सुरू केले आहे. पण लॉर्ड्स (Lord's) येथे पहिल्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध कामगिरीनंतर न्यूझीलंड (New Zealand) संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्यापूर्वी टीम इंडियाची (Team India) डोकेदुखी वाढवली असेल. इंग्लंड-न्यूझीलंड संघातील लॉर्ड्स येथे झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला तरी किवी संघाने पावसाने बाधित झालेल्या सामन्यात वर्चस्व गाजवले आणि एकप्रकारे भारतीय संघाला चेतावणी दिली. डेव्हन कॉनवेचे (Devon Conway) दुहेरी शतक असो किंवा टिम साउदीची (Tim Southee) शानदार गोलंदाजी व स्थितीचा उत्कृष्ट उपयोग, केन विल्यमसनच्या (Kane Williamson) टीमने हे सिद्ध केले की विराटच्या टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या फायनल सामन्यात त्यांच्यावर मात करणे सोपे होणार नाही. (ICC WTC Final 2021: आयसीसीच्या एका नियमाने कसे इंग्लंडला केले फायनल सामन्यातून आऊट आणि न्यूझीलंडची लागली लॉटरी, वाचा सविस्तर)

डेव्हन कॉनवे

ब्लॅककॅप्सने टीम इंडियाला पाठवलेल्या तीन चेतावणींपैकी पहिली म्हणजे पदार्पणवीर कॉनवे. कॉनवेच्या विक्रमी दुहेरी शतकामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात मजबूत खेळी करता आली. कॉनवेच्या सनसनाटी 200 धावांनी किवी संघाला पहिल्या डावात 347 धावांपर्यंत मजल मारून दिली. पदार्पणातील 200, तेही इंग्लिश परिस्थितीत खरोखरच विशेष होते परंतु त्यापेक्षा खास कारण तो स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसनविरुद्ध खेळला. यामुळे WTC फायनल सामन्याआधी त्याचा आत्मविश्वास वाढेल जिथे त्याचा सामना भारताच्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व इशांत शर्मा यांच्याशी होणार आहे.

अनुभवी टिम साउदी आणि काइल जेमीसनचा शानदार फॉर्म

इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्यात पहिल्या डावात सहा विकेट्स घेत साउदीने किवी गोलंदाजी हल्ल्याचे नेतृत्व केले. साउदीला बॉल स्विंग करणे माहित आहे आणि इंग्लंडच्या परिस्थितीमुळे त्याचे काम सोपे होईल. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये टीम इंडियासाठी साउदी नक्कीच सर्वात मोठी डोकेदुखी ठरेल. दुसरीकडे, त्याचा सहकारी भागीदार काईल जेमीसनने देखील चांगला फॉर्म दर्शविला ज्यामुळे भारतीय लाइन-अपमध्ये अडचणी येऊ शकतात.

भारतासाठी सराव सामन्यांचा अभाव

किवीस इंग्लंडविरुद्ध सामना खेळत असताना भारतीय संघ हॉटेलमध्ये क्वारंटाईन पूर्ण करत आहे. भारतीय दिग्गज दिलीप वेंगसरकर यांच्या म्हणण्यानुसार- ‘इंग्लिश परिस्थितीशी जुळवून न घेणे आणि सामन्यांच्या अभ्यासाअभावी भारताला खूपच महागात पडू शकते.’ टीम इंडियाने अखेरचा कसोटी सामना मार्च महिन्यात खेळला होता तर मे महिन्यात आयपीएल स्थगित झाल्यावर संघ थेट फायनल सामन्यात मैदानावर उतरणार आहे.