कोरोना रुग्णांचा मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Maharashtra CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

राज्यातील सर्व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल. तसेच मृत्यू दरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शुन्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्संनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्सची स्थापन करण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे. म्हणून जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहेत. परंतु, त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता. या भागातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असेदेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. (हेही वाचा - शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची पुढील 3 वर्षासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती)

यावेळी टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले की, वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे दिली जातात. त्याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. नको तिथे अनावश्यक औषधी देऊ नये. अडचण येईल तेव्हा तात्काळ आम्हाला संपर्क करा, असं आवाहनदेखील ओक यांनी केलं आहे.