महाराष्ट्राची संस्कृती आणि साहित्याचा कणा असलेली मराठी भाषा २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आपला 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करत आहे. महान कवी, नाटककार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील मराठी भाषिक आपल्या मायबोलीप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत. यंदा नाशिकमध्ये होणारे 'विश्व मराठी संमेलन' या उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरत असून, सोशल मीडियावरही मराठी अस्मितेचा जागर पाहायला मिळत आहे.
कुसुमाग्रज आणि मराठी भाषेचा ऋणानुबंध
विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. त्यांनी आपल्या लेखणीतून मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. 'नटसम्राट' सारखी अजरामर नाटके आणि 'विशाखा' सारखे क्रांतीकारी काव्यसंग्रह ही त्यांची देणगी आहे. मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने २०१३ पासून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित केला.
मराठी भाषा गौरव दिन 2026 शुभेच्छा संदेश (Messages)
या खास दिवशी तुम्ही तुमच्या मित्र-परिवाराला खालीलप्रमाणे शुभेच्छा देऊ शकता:
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा."
"माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजासी जिंके. मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा."
"गर्व आहे मला मराठी असल्याचा, अभिमान आहे मला मराठी बोलण्याचा. मराठी भाषा गौरव दिन २०२६."
"माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा. मराठी दिनाच्या शुभेच्छा."
राजभाषा दिन आणि गौरव दिन यातील फरक
अनेकदा लोकांचा 'मराठी राजभाषा दिन' आणि 'मराठी भाषा गौरव दिन' यामध्ये गोंधळ उडतो. १ मे रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्या स्मरणार्थ 'मराठी राजभाषा दिन' साजरा केला जातो. तर २७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रजांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यासाठी 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा होतो.
यंदा नाशिकमध्ये २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत चौथ्या 'विश्व मराठी संमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध ग्रंथदिंडी, कविता वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवला जात आहे.