अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी खेळल्या गेलेल्या ICC T20 विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ सामन्यात गतविजेत्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला. १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या एकतर्फी सामन्यात भारताचा डाव केवळ १११ धावांत आटोपला. या पराभवानंतर सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनी मीम्सचा पाऊस पाडत आपला संताप आणि निराशा व्यक्त केली आहे.
दक्षिण आफ्रिकेची दमदार फलंदाजी आणि मिलरचे अर्धशतक
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली होती. एका वेळी त्यांची स्थिती २० धावांवर ३ बाद अशी होती. मात्र, अनुभवी डेव्हिड मिलर (६३ धावा) आणि युवा डेवाल्ड ब्रेव्हिस (४५ धावा) यांनी ९७ धावांची भागीदारी करून डावाला आकार दिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने १५ धावांत ३ बळी घेत प्रभावी मारा केला आणि टी-२० विश्वचषकात भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याचा मान मिळवला. मात्र, ट्रिस्टन स्टब्सच्या फटकेबाजीमुळे आफ्रिकेने २० षटकांत १८७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले.
भारतीय फलंदाजीचे अपयश आणि मार्को जॅनसेनचा तडाखा
प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला मार्को जॅनसेनने सुरुवातीलाच धक्के दिले. इशान किशन, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा स्वस्तात बाद झाल्यामुळे भारतीय संघ दबावाखाली आला. कर्णधार सूर्यकुमार यादवही मोठी खेळी करू शकला नाही. शिवम दुबेने सर्वाधिक ४२ धावा केल्या, मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. जॅनसेनने २२ धावांत ४ बळी घेत भारताच्या डावाचे कंबरडे मोडले. भारताचा संपूर्ण संघ १८.५ षटकांत १११ धावांवर बाद झाला.
सोशल मीडियावर मीम्सचा महापूर
भारताचा हा अनपेक्षित फलंदाजीचा कोलमडलेला डाव पाहून क्रिकेट चाहते थक्क झाले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) आणि इंस्टाग्रामवर अनेक मजेशीर आणि उपरोधिक मीम्स व्हायरल झाले आहेत. विशेषतः स्टार स्पोर्ट्सच्या 'कपकेक' जाहिरातीवरून चाहत्यांनी भारतीय संघाला ट्रोल केले आहे. "जाहिराती करण्यात व्यस्त, क्रिकेटमध्ये सुस्त" अशा प्रकारच्या कमेंट्ससह चाहत्यांनी खेळाडूंच्या शॉट सिलेक्शनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Me watching Yellow jersey team defeat India in World Cup at Ahemdabad Stadium pic.twitter.com/ie3BbBuXIU
— Sagar (@sagarcasm) February 22, 2026
Sanju watching it closely #INDvSA pic.twitter.com/rYdcV309KN
— Naresh 🧢 (@Nareshkatta7799) February 22, 2026
The Panoti Stadium 🏟️ For Team India.#NarendraModiStadium #IndVsSA pic.twitter.com/8MVqvwt9BY
— Adil Arfin (@ArfinAdil) February 22, 2026
पुढील वाटचाल आव्हानात्मक
या मोठ्या पराभवामुळे भारताच्या 'नेट रन रेट'वर (NRR) विपरीत परिणाम झाला आहे. सुपर ८ च्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला आता झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकणे अनिवार्य झाले आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर कबूल केले की, फलंदाजीमध्ये भागीदारी न होणे हे पराभवाचे मुख्य कारण ठरले.