Manipur Violence: मणिपूर मध्ये अडकलेले महाराष्ट्रातील  विद्यार्थी आज संध्याकाळी विशेष विमानाने राज्यात परतणार - मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती
Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

मणिपूर मध्ये जातीय हिंसाचारामुळे (Manipur Violence) वातावरण पेटलेले आहे. अशामध्ये IIT विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले काही महाराष्ट्रातील विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांना सुखरूप राज्यात पुन्हा आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विद्यार्थ्यांशी फोनवर बोलून मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यानुसार आज गुवाहाटीला 4.30 वाजता एक विशेष विमान रवाना करून 6.30 च्या सुमारास हे अडकलेले विद्यार्थी राज्यात पुन्हा परतणार आहेत.

मणिपूरमधल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार सज्ज झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना फोन करुन काळजी करु नका असं म्हणत त्यांच्या मदतीला तयार असल्याचे म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचारामुळे परिस्थिती तणावाची आहे. स्थानिक तणावामुळे विद्यार्थी चिंतित होते तेव्हा फडणवीसांनी विद्यार्थ्यांना फोन करुन त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर फडणवीसांनी मणिपूर सरकारशीही संपर्क साधत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंतीही केली होती. आता या विद्यार्थ्यांना राज्यात पुन्हा आणण्यासाठी विशेष विमान रवाना होईल.  Manipur Violence: मणिपूर हिंसाचार; आयटी विभागाच्या अधिकाऱ्याची घरात घुसुन हत्या .

पहा ट्वीट

मणिपूरमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठा जातीय हिंसाचारात सुरु झाला आहे. मागील काही दिवसांत त्या हिंसाचारात 50 पेक्षा अधिकांनी जीव गमावला आहे.  कायदा व्यवस्था बिघडल्याने कर्फ्यू लावण्यात आला आहे. पण जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही काळासाठी या कडक निर्बंधांमधून शिथिलता देखील देण्यात आली आहे.