छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसदारांनी भाजपमधून राजीनामे द्यावेत; 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तक वादावर शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक
Shiv Sena MP Sanjay Raut | (PC - Facebook)

Aaj Ke Shivaji -Narendra Modi Book Controversy: छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज (Chhatrapati Shivaji Maharaj Descendant) आज भाजपमध्ये आहेत. त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी करत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' (Aaj Ke Shivaji -Narendra Modi) या पुस्तकावर भाष्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांची तुलना कोणत्याही व्यक्तीसोबत करणे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी त्याविरोधात भूमिका घेतली पाहिजे. प्रामुख्याने सातारा (Satara) आणि कोल्हापूर (Kolhapur) या गादीवर असलेल्या छत्रपतींच्या वंशजांनी त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे असेही, खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा जनमानसात कायम उंच ठेवण्याचे काम जनता करते आहे. परंतू, त्यांच्या प्रतिमेशी जर कोणी तुलना करत असेल तर, त्याविरोधात महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका घेतली पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले. दरम्यान, खा. संजय राऊत आणि कोल्हापूर येथील खासदार छत्रपती संभाजी यांच्यात या पुस्तकावरुन काल (12 जानेवारी 2020) ट्विटरवर जोरदार खडाजंगी झाली होती. या वादावरही खा. राऊत यांनी भाष्य केले. या पुस्तकावरुन निर्माण झालेल्या वादावर आपण काहीही चुकीचे बोललो नाही. छत्रपतींशी जर कोणी एखाद्या व्यक्तीशी तुलना करत असेल तर, त्याचा आपण विरोध केला पाहिजे. यात चुकीचे ते काय? असा सवाल करतानाच आपण छत्रपतींचे वंशज आहात. त्यामुळे जनतेला आपल्याकडून अधिक आपेक्षा आहेत. त्यामुळे तुम्ही या विषयावर भूमिका घेऊन बोललेच पाहिजे. इतकेच नव्हे तर, आपल्या पदांचे राजीनामेही द्यायला हवेत, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, छत्रपतींशी करण्यात आलेल्या तुलनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काहीच दोष नाही. प्रमुख नेत्यांच्या परोक्ष अनेकदा अशी चमचेगीरी चालते. त्यामुळे प्रमुख नेत्याला अनेकदा अडचणीत यावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कदाचित हे माहिती नसेल की, त्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अशी काही तुलना केली गेली असेल. परंतू, भाजपने केंद्रातील गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन हे पुस्तक मागे घ्यायला हवे, अशी मगणीही राऊत यांनी या वेळी केली. (हेही वाचा, 'आज के शिवाजी नेरेंद्र मोदी' पुस्तक वाद: राजकीय माकडं सत्ता बदलली की ईमान बदलतात,आपला राजा बदलतात- ‘चला हवा येऊ द्या’ पत्र फेम लेखक अरविंद जगताप यांचा निशाणा)

दरम्यान, या पुस्तकाबाबत आपण स्वत: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी कोणत्याही प्रकारची चुक हा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे राऊत म्हणाले.

जय भगवान गोयल नावाच्या व्यक्तीने लिहिलेल्या एका पुस्तकाचे प्रकाशन भाजप कार्यालयात नुकतेच झाले. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकावर त्याच्या शिर्षकावरुन महाराष्ट्रातील तमाम इतिहासकार, शिवाजी महाराजांचे वंशज आणि विविध राजकीय नेते आणि राजकीय पक्ष यांनी आक्षेप घेतला आहे. याच वादावरुन शिवसेना खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरातील खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यात ट्विटरवर खडाजंगी पाहायला मिळाली. तर, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षानेही या पुस्तकाविरोधात आपली भूमिका व्यक्त केली आहे. या सर्व प्रकारानंतर शिवसेना खासदा संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका व्यक्त केली आहे.