Sachin Vaze Case: सचीन वाझे प्रकरणी मुख्यमंत्री वकिली का करतात? भाजप आमदार नितेश राणे यांची शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात शिवसेना (Shiv Sena) नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे प्रकरणात (Sachin Vaze Case) मुख्यमंत्री वकिली का करत आहेत. दैनिक सामनाचे संपादकही त्याची वकील करत आहेत याचे नेमके कारण काय आहे? असा थेट सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. याच वेळी सचिन वाझे आणि वरुण सरदेसाई यांच्यात फोन आणि इतर माध्यमातून नेमके बोलणे काय झाले. सरदेसाई हे कोणाचे नातेवाईक आहेत, त्यांना कोणाचा वरदहस्त आहे, याचीही चौकशी करण्यात यावी असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

नितेश राणे यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते बोलत होते. या वेळी बोलताना नितेश राणे म्हणाले राज्यासमोर आणि देशासमोरही एक विषय सध्या गाजतो आहे. हा विषय म्हणजे सचिन वाझे. सचिन वाझे हा काही कोणी मोठा अधिकारी नाही. एक एपीआय दर्जाचा पोलीस अधिकारी एवढं मोठं पाऊल उचलतो आणि विशेष म्हणजे त्याचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्याची वकील करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री पुढे येतात हे नेमके कसे काय. मुख्यमंत्री आणि सामनाचे संपादक सचिन वाझे हे किती चांगला आहे हे सांगत असतात. हे सांगण्यामागे नेमके कारण काय आहे, असेही नितेश राणे यांनी यावेळी म्हटले. (हेही वाचा, Sachin Vaze Suspend: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे निलंबन)

दरम्यान, नितेश राणे यांनी गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या आयपीएल दरम्यान झालेल्या सट्टेबाजीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, गेल्या वर्षी आपल्याकडे आयपीएल मालिका खेळली गेली. ही मालीका साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात खेळली गेली. या काळात आयपीएलच्या नावाखाली जे काही सुरु होते त्या प्रकरणाशी नेमके वाझेच कसे काय निगडी आहेत? आयपीएलमध्ये जे लोक सट्टा लावत होते त्यांना वाझे फोन करत असत. तसेच, वाझे यांना शिवसेनेनेच वरुण सरदेसाई हे फोन करत असत, अशी माहिती आमच्याकडे आहे, असे नितेश राणे या वेळी म्हणाले.