Ruturaj Deshmukh, 21 वर्षीय सरपंच ने सोलापूरच्या घाटणे गावाला  'बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' मॉडेलने केले कोरोनामुक्त
Ruturaj Deshmukh's Ghatane Village | Photo Credits: Twitter/ANI

आजकालची तरूणपिढी खूप उथळ आहे अशी सहज टीपण्णी ज्येष्ठ मंडळींकडून केली जाते. त्याला राजकीय क्षेत्रदेखील अपवाद नाही. पण या कोरोना संकटकाळात अनेक युवा नेत्यांनीच प्रगत तंत्रज्ञान, काळाची गरज ओळखून प्रयोगशीलता वापरत कोरोनाला थोपवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्यापैकीच एक नाव म्हणजे ऋतूराज देशमुख (Ruturaj Deshmukh). सर्वात तरूण सरपंच असणारा ऋतूराज सोलापूरातील घाटणे गाव (Ghatane village, Solapur) या कोविडमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक होत आहे. 'बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' हे त्याचं मॉडेल सध्या कौतुक मिळवत आहे. खासदार सुप्रिया सुळेंनीही (Supriya Sule) त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

भारतात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असताना ऋतूराजने मोहोळ मधील घाटणे गावात 'बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' हा सकारात्मक संदेश दिला. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला गावात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. 2 मृत्यू देखील झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. मग गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी ऋतुराजने रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या गोष्टींवर भर दिला. गावातील जे ग्रामस्थ शहरात जातात किंवा जनसंपर्क अधिक असलेले व्यवसाय करतात अशा ग्रामस्थांसाठी आवश्यकतेनुसार रॅपिड अॅन्टिजेन टेस्टिंग सुरू केले. गावातील 45 वर्षांवरील ग्रामस्थांचे लसीकरण करून घेणे, आशा वर्कर्सच्या मदतीने वेळोवेळी गावकऱ्यांची ऑक्सिजन लेव्हल, तापमान तपासणे, गावातील प्रत्येक कुटुंबाला व्हिटॅमिनच्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण यांचा समावेश असेलेले 'कोरोना सेफ्टी कीट' देणे अशा विविध उपाययोजना राबवल्या. गावात विलिगीकरण कक्ष आणि मिनी कोविड सेंटर सुरू करून सर्व आवश्यक गोष्टींच्या उपलब्धतेबाबत ऋतुराजने विशेष लक्ष पुरविले. त्याच्या या प्रयत्नाला गावकर्‍यांनी देखील साथ दिली असल्याने आता गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी मदत झाली आहे. दरम्यान यामध्ये 60% गावकर्‍यांची तपासणी झाली असे देखील ऋतूराज सांगतो. ( वाचा सविस्तर: सोलापुरात ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेले 21 वर्षीय ऋतुराज सर्वात तरुण उमेदवार, वाचा सविस्तर).

सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

दरम्यान महाराष्ट्रात अशाच प्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील भोयरे खुर्द आणि नांदेड जिल्ह्यातील सहा हजार लोकसंख्या असलेल्या भोसी या गावाने कोरोनामुक्तीसाठी चोखाळलेलला मार्ग ही असाच एक यशस्वी प्रयत्न असून आता प्रशासन ग्रामीण भागात त्याचे अनुकरण करणार आहे. महाराष्ट्रात आता हळूहळू कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळत आहे. एकीकडे लसीकरण वेगवान करण्यासोबत राज्यातील लॉकडाऊम 1 जून नंतरही पुढे 15 दिवस वाढवण्यात आला आहे. यामुळे आता कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल असा सरकारचा विश्वास आहे.