Rajya Natya Spardha 2022: राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सावरकरप्रेमींचा गोंधळ, नाटकही पाडले बंद
(संग्रहित संपादित प्रतिमा)

61 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेला (Rajya Natya Spardha 2022) सुरूवात झाली आहे पण अहमद केंद्रावर पहिल्या दिवसापासूनच या स्पर्धेसोबत वाद देखील सुरू झाले आहेत. नगरच्या केंद्रावर 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय'(Me Pan Nathuram Godsech Boltoy) या नाटकाचं सादरीकरण सुरू असताना गोंधळ झाला. या नाटकात सावरकरांची प्रतिमा चूकीची दाखवल्याचा दावा करत सावरकरप्रेमींनी चालू खेळ घोषणाबाजी करत बंद पाडला.

अहमदनगरमध्ये स्वराज्य प्रतिष्ठान कडून राज्य नाट्य स्पर्धेमध्ये 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' नाटक सादर करण्यात आले. यामध्ये स्वातंत्रयवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या प्रतिमा चूकीच्या दाखवण्यात आल्या आहेत. असा दावा सावरकर प्रेमींनी केला आहे. , हे नाटक सादर करणारे कलाकारांचा दिग्दर्शकांचा व स्पर्धेच्या आयोजकांचे निषेध करण्यात आला आहे.

काही ज्येष्ठ रंगकर्मींनी देखील या नाटकात चुकीचा इतिहास दाखवलं असल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर झालेल्या राडेबाजीला रोखण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मीडियाशी बोलताना सावरकर प्रेमींच्या वतीने उत्कर्ष गीते व अमोल हुबे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घालणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय कडून 61 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा महोत्सव 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर केंद्रावर 15 नोव्हेंबर पासून पुढील महिनाभर  या स्पर्धा होणार आहेत.

महाराष्ट्रामध्ये सध्या 'हर हर महादेव' सिनेमात देखील शिवरायांबद्दल चूकीचा इतिहास दाखवला जात असल्यावरून वातावरण तापलेले आहे.