Shiv Sena: राहुल शेवाळे लोकसभेतील शिवसेना गटनेते, भावना गवळी चिप व्हीप- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

राज्यातील शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP Alliance) सरकारचे आमदार खासदार आणि जनतेतून प्रचंड स्वागत होत आहे. आमचा कोणताही वैयक्तीक अजेंडा नाही. केवळ जनतेच्या हितासाठीच आम्ही नवे सरकार बनविणयाचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. ते दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांचा उल्लेश शिवसेना गटनेता असा केला. तर भावना गवळी (Bhavna Gawli) यांचा उल्लेख मुख्य प्रतोद म्हणून केला. तसेच, ओबीसी आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका आहे. त्या संदर्भात वकीलांना भेटण्यासाठी आपण दिल्लीला आलो होतो. तसेच, नवे गटनेते राहुल शेवाळे यांचेही स्वागत करायचे होते म्हणून आपण दिल्लीला आलो असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही गटनेता बदलण्याबाबत एक पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात आम्ही शिवसेना-भाजप युती सरकार स्थापन करण्याचा जो निर्णय घेतला. तोच निर्णय शिवसेना खासदारांनीही घेतला आहे. त्यामुळे शिवसेना खासदारांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायलला होते ते आज होते आहे. आम्ही शिवसेना भाजप युती सरकार स्थापन करण्याचा जो निर्णय घेतला आहे. तो निर्णय केवळ आमदार-खासदारच नव्हे तर सर्वसामान्य जनतेलाही आवडला आहे. सामान्य जनतेकडूनही या निर्णयाचे स्वागत होत, आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Politics & Shiv Sena MP: एकनाथ शिंदे गटाच्या पत्रात लोकसभा सचिवालयाने सुचवले बदल, वर्चस्वाच्या लढाईला ब्रेक)

ट्विट

केंद्रात आणि राज्यात जर एकाच विचाराचे सरकार असेल तर देश आणि राज्याच्या विकासाला गती प्राप्त होते. देशाच्या राज्याच्या विकासासाठी केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असायला हवे. त्यामुळे आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय आवडला नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा शिवसेना, भाजप युतीचे सरकार स्थापन करण्याचा विचार केला. शिसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य आनंद दिघे यांच्याच विचारांतून प्रेरणा घेऊन आम्ही हे पाऊल टाकले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आहे. केंद्रातील सरकार महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती सरकारच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारे मदत लागली तरी ती द्यायचे त्यांनी कबूल केले आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.