MSRTC Bus Accident Indore: एमएसआरटीसी बसला मध्य प्रदेशमध्ये अपघात, पुलाचा कठडा तोडून बस नर्मदा नदीत कोसळली; 13 जणांचा मृत्यू, 15 जण बेपत्ता
MSRTC Bus Accident Indore | (Photo Credit - Twitter/ANI)

इंदूरहून (Indore) जळगावच्या दिशेने जाणारी बस नर्मदा नदीत (Narmada River) कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण बेपत्ता आहेत. ही घटना मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील धार (Dhar) येथे घडली. ही बस इंदूरहून जळगावातील अमळनेर येथे येणार होती. दरम्यान तिचा अपघात घडला. अपघाताचे नेमेके कारण अद्यापही पुढे आले नाही. मदत आणि बचाव कार्यास सुरुवात झाली आहे. बस क्रेनच्या सहाय्याने पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. बसमध्ये 50 ते 55 प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार आग्रा-मुंबई (Agra-Mumbai (AB Road) Highwa) महामार्गावर हा अपघात झाला. हा महामार्ग इंदूरहून महाराष्ट्राला जोडतो. इंदूरपासून अपघाताचे घटनास्थळ 80 किलोमीटर अंतरावर आहे. ज्या पूलावरुन ही बस कोसळली तो संजय सेतू पूल (Sanjay Setu Bridge) धार (Dhar) आणि खरगोन (Khargone) या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेला आहे. पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) मध्ये आणि अर्धा भाग खलटाका (खरगोन) मध्ये आहे. (हेही वाचा, Uttarakhand: उत्तराखंमध्ये भीषण अपघात; 22 लोकांचा मृत्यू, 6 जखमी, यात्रेकरूंनी भरलेली बस दरीत कोसळली)

ट्विट

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी माहिती देताना प्रसारमाध्यमांना सांगितले की, अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी महामंडळाची आहे. ही बस इंदूरहून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे येमार होती. दरम्यान तिचा अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच एसटीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले आहेत. हे अधिकारी परिस्थीतीची पाहणी करतील अशी माहिती चन्ने यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, एसटी महामंडळाची ही बस सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास इंदूरहून जळगावसाठी निघाली. या बसमध्ये इंदूर येथे 12 प्रवासी चढले. बसचा प्रवास सुरु झाला. बस नर्मादा नदीच्या पुलावर येताच पुलावरुन ही बसखाली कोसळली. बसमधील 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 13 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. तर इतरांचा शोध सुरु आहे.