सोलापूर: दिवाळीत माहेरी आलेल्या विवाहितेचा एकतर्फी प्रेमातून खून
Representational Image (Photo Credits: Facebook)

दिवाळीच्या निमित्ताने माहेरी आलेल्या विवाहितेचा एका माथेफिरु तरुणाने एकतर्फी प्रेमातून खून केला. ही घटना सोलापूर (Solapur) येथील दामणनगराजवळ शुक्रवारी सकाळी घडली. आरोपी हा शेजारीच राहणारा असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मृत महिला 15 दिवसांपासून माहेरी आली होती. तसेच शुक्रवारी या महिलेच्या मुलीला खोकल्याचा त्रास सुरु झाल्याने तिला घराजवळील खाजगी रुग्णालयात घेऊन गेली होती. त्यावेळी आरोपीही त्याठिकाणी येऊन आपले संबधित महिलेवर प्रेम असल्याचे सांगू लागला. परंतु, महिलेने आरोपीला विरोध केल्यामुळे तो संतापला. या नैराश्यातून आरोपीने महिलेचा गळा आवळून खून केला.

प्रियंका तुकाराम गोडगे (22) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर राजू श्रीकांत शके असे या घटनेतील आरोपीचे नाव आहे. राजू याने एकतर्फी प्रेमातून आपल्या मुलीचा खून केला आहे, अशी तक्रार प्रियंकाच्या वडिलांनी शुक्रवारी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंदवली. प्रियंकाची मुलगी श्रेया हीला खोकल्याचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे प्रियंका श्रेयाला जवळील खाजगी रुग्णालयात घेवून गेली होती. दरम्यान राजू याने प्रियंकाला रस्त्यात अडवले. त्यावेळी दोघांमध्ये बरीच बाचाबाची झाली. प्रियंका आपल्या प्रेमाला विरोध करत असल्याचे त्याला समजताच त्याने प्रियंकाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर राजू याने प्रियंकाच्या भावाचा मित्र श्याम निकम याला फोन करुन संबधित ठिकाणी बोलावून घेतले. श्याम त्या ठिकाणी पोहचल्यानंतर त्याने पाहिले की, प्रियंका जमीनीवर चिखलात निपचित पडली होती. त्यावेळी श्यामने राजूला तु हे काय केले आहेस असा प्रश्न विचारला. त्यावर राजू हा स्थानिक पोलीस ठाण्यात जात असल्याचे सांगून श्रेयाला श्यामच्या हवाली केले. श्यामने हा सर्वप्रकार प्रियंकाच्या घरी जाऊन सांगितला. त्यानंतर प्रियंकाला तातडीने रुग्णालयात घेऊन जाऊ लागले. परंतु, रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. हे देखील वाचा- मुंबई: आपल्या 30 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरचा खून केल्याप्रकरणी 20 वर्षीय युवकाला अटक; व्यभिचाराच्या संशयामधून हे कृत्य घडल्याचा संशय

प्रियंकाचे वडील अश्विनी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत. प्रियंका हिचे 4 वर्षापूर्वी विवाह झाले असून ती दिवाळीच्या निमित्ताने आपल्या माहेरी आली होती. प्रियंकाच्या विवाहपूर्वी राजू हा तिची छेडछाड करत असे. त्यावेळी प्रियंकाच्या वडिलांनी त्याची कडक आवाजात कानउघाडणी केली होती. तसेच राजूच्या घरातील सदस्यांकडे त्याची तक्रार केली होती.