Maharashtra Weather Forecast: औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली सह 'या' भागात पुढील 3-4 तासांत पर्जन्यवृष्टीची शक्यता- IMD
Maharashtra Monsoon 2020 | Image Used For Representative Purpose | Photo Credits: unsplash.com

मराठवाडा (Marathwda), विदर्भ (Vidarbha), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) या भागांतही 10 ऑक्टोबर पासून पाऊस सक्रीय होण्याचा अंदाज यापूर्वी हवामान खात्याने वर्तवला होता. या दरम्यान ढगांच्या गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पर्जन्यवृष्टी होईल, असा इशाराही देण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. औरंगाबाद (Aurangabad), जालना (Jalna), परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli), वाशिम (Washim), बुलढाणा (Buldhana) सह आजूबाजूच्या परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पुढील 3-4 तासांत मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ही माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

पुढील 2 दिवस मराठवाड्याती ही परिस्थिती कायम राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 28 सप्टेंबर पासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अधूनमधून ढगाळ वातावरण, पाऊस, ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळतो. काल संध्याकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई मध्ये ढग दाटून मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. (10 ऑक्टोबर पासून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सक्रीय होण्याची शक्यता)

K S Hosalikar Tweet:

यंदाच्या पावसाने राज्यात 'हासू आणि आसू' अशी परिस्थिती निर्माण केली. राज्याच्या विविध भागांत दमदार पर्जन्यवृष्टी झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे पाणी संकट टळले. परंतु, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन मोठे नुकसान झाले.