Coronavirus in Maharashtra: तब्बल 8 महिन्यांनतर कोरोना विषाणूबाबत सकारात्मक बातमी; महाराष्ट्रात आज 2,544 रुग्णांची नोंद
Coronavirus (Photo Credits: PTI)

चीनच्या वूहान शहरामधून कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाला सुरुवात झाली होती. हळू हळू या विषाणूने जगातील अनेक देशांमध्ये शिरकाव केला. गेल्या काही महिन्यांपासून भारतही या विषाणूशी सामना करीत आहे. यामध्ये महाराष्ट्राची (Maharashtra) स्थिती अतिशय गंभीर होती. गेले कित्येक महिने राज्यात दररोज 10 हजाराच्या वर कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र आता गेल्या 8 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 2,544 रुग्णांची आणि 60 मृत्यूंची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये आज 3,065 रुग्ण बरे झाले होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात कोरोना विषाणूचे 84,918 सक्रीय रुग्ण असून, आतापर्यंत एकूण 16,15,379 रुग्ण बरे झाले आहेत. यात दुर्दैवी बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत एकूण 45,974 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 92.45 टक्के आहे व राज्यातील मृत्युदर 2.63 पर्यंत खाली आला आहे. महत्वाचे राजधानी मुंबईमध्येही सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली असून, सध्या ती 13532 आहे.

गेले काही महिने महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना राबवल्या आहे. यासह विविध मार्गांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयांची संख्या वाढवणे, बेड्सची संख्या वाढवणे, गजरेनुसार टेस्टिंगची संख्या वाढवणे, लॉक डाऊनमध्ये शिथिलता आणत अनेक नियमांचे पालन करणे, अशा अनेक गोष्टींमुळे आज राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. (हेही वाचा: कोरोना रुग्णांसाठी आनंदाची बातमी; दिवाळी निमित्त मुंबईतील अनेक कोविड सेंटर्सने घेतला 'हा' निर्णय)

दरम्यान, महाराष्ट्रात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. य पार्श्वभूमीवरही आरोग्य विभाग उपयोजना राबवत आहे. दुसरीकडे पुण्यातल्या कोव्हीशिल्ड (Covishield) लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची नोंदणी पूर्ण झाली असून, भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार असल्याची माहिती मिळत आहे.