अरबी समुद्रामध्ये 'महा' चक्रीवादळाची तीव्रता घटली; मुंबई, ठाणे, पालघर मध्ये आज पावसाची शक्यता
MAHA Cyclone | Photo Credits: PTI

मागील काही दिवसांपासून अरबी समुद्रामध्ये खवळलेले 'महा' चक्रीवादळ आता शमण्यास सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 'महा' चक्रीवादळ गुजरातच्या समुद्र किनार्‍याला धडकण्याची शक्यता कमी आहे. दिलासादायक बाब म्हणजे 'महा' चक्रीवादळाची तीव्रता समुद्रामध्येच ओसरणार आहे. त्यामुळे किनारपट्टीला राहणार्‍या आणि मच्छीमार्‍यांसाठी ही बाब मोठी दिलासादायक आहे. मागील काही दिवस चक्रीवादळामुळे शेतकरी आणि मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई शहरामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यापासून 400 किलोमीटर, वेरावळ किनाऱ्यापासून 440 किलोमीटर तर दीवपासून 490 किलोमीटरवर 'महा' चक्रीवादळ आहे. मात्र हे वादळ पूर्व दिशेने हे वादळ पुढे सरकत आहे. या वादळाची तीव्रता हळूहळू कमी होत चालली असून किनारपट्टीला न धडकता हे चक्रीवादळ समुद्रातच विरून जाईल असे सांगण्यात आले आहे.

ANI Tweet  

अरबी समुद्रामध्ये 'महा' चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी पूर्व किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरामध्ये मात्र 'बुलबुल' चक्रीवादळ आता जोर पकडत आहे. पुढील 24-36 तासांमध्ये हे बुलबुल चक्रीवादळ अतिशय तीव्र होऊ शकतं असे सांगण्यात आले आहे. हे वादळ पुढील काही तासांमध्ये पश्चिम बंगाल, बांग्लादेशकडे जात आहे.