Maharashtra Rain Update: कोकणात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; मुंबई ठाण्यालाही सावधानीचा इशारा
Mumbai Rains | Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात मान्सूनचे (Maharashtra Rain) आगमन झाल्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यातील नागरिकांना पावसाने झोडपून काढले आहे. दरम्यान, कोकण आणि मुंबई शहर उपनगरात आज पहाटेपासून जोरदार पाऊस पडत आहे. याचपार्श्वभूमीवर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणसह (Kokan) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि विदर्भातही (Vidarbha) पुढील 3, 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांनी पुढील तीन-चार दिवस अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असेही आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

कोकणात रत्नागिरीत, गुहागर जिल्ह्यात काल रात्री पावसाने दमदार हजेरी लावली आहे. चिपळून, मंडणगड, दापोली संगमेश्वर, राजापूरलाही दमदार पावसाने झोडपून काढले आहे. तर रोहा, कोलाड, पाली आणि सुधागडमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ओढे पूर्ण प्रवाहित झाले आहेत. रत्नागिरीत गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु होती. मात्र, काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे रत्नागिरीला जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Mumbai Rains: मुंबई मध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार सुरू

ट्वीट-

मुंबई मध्ये मागील 2 दिवस पावसाने थोडी उसंत घेतली होती. पण, काल रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, मुंबईत आज सकाळी जोरदार पाऊस झाला आहे. परिणामी, मुंबईच्या सायन, हिंदमाता चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ज्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.