Delhi-Katra Vande Bharat Train: माता वैष्णो देवी भक्तांसाठी खुशखबर; नवरात्रीच्या आधी 15 ऑक्टोबरपासून सुरु होणार दिल्ली-कटरा वंदे भारत ट्रेन, जाणून घ्या Time Table
Vaishno Devi Temple (PC - Wikimedia Commons)

अनलॉक 5 मध्ये, सर्व आर्थिक क्रिया सामान्य होत असताना दिसत आहेत. आता भारतीय रेल्वे (Indian Railways) सेवा देखील हळूहळू रुळावर परतली आहे. विशेष रेल्वेगाडींबरोबरच भारतीय रेल्वेने धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देवी वैष्णो देवीच्या (Mata Vaishno Devi) भक्तांसाठी चांगली बातमी आली आहे. यावर्षी 17 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होणार आहे. नवरात्रातील बरेच लोक वैष्णो देवीच्या दर्शनासाठी जातात. भारतीय रेल्वेने निर्णय घेतला आहे की, आता दिल्ली ते माता वैष्णो देवी कटरा (Delhi-Katra Vande Bharat Train) दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन 15 ऑक्टोबरपासून पुन्हा चालविली जाईल.

ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू केल्याने ज्यांना वैष्णो देवीला जाण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यांना मोठा फायदा होईल. याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘नवरात्रोत्सवापूर्वी जम्मू-काश्मीरमधील कटरा गाडी पुन्हा सुरू करण्याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर, रेल्वे मंत्रालयाने नवी दिल्ली-कटरा वैष्णो देवी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सेवा 15 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.’ गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून देशात सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सेवा सुरू करण्यात आली. याद्वारे दिल्लीवरून जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे पोहोचण्यास फक्त 8 तास लागतात. ही गाडी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी 'मेक इन इंडिया' प्रकल्पातील एक भाग आहे. (हेही वाचा: भारतीय रेल्वेचा नवीन प्लॅन जाहीर, Mail आणि Express ट्रेनमधून हटवण्यात येणार स्लीपर कोच; जाणून घ्या काय आहेत बदल)

भारतीय रेल्वेने 15 ऑक्टोबरपासून नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटरा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन (22439/22440) पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन मंगळवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावेल. ही ट्रेन नवी दिल्लीहून सकाळी 6 वाजता सुटते आणि दुपारी 2 वाजता श्री माता वैष्णो देवी कटरा स्थानकात पोहोचते. त्याचवेळी ही गाडी श्री माता वैष्णो देवी कटरा येथून दुपारी 3 वाजता सुटते आणि रात्री 11 वाजता नवी दिल्लीला पोहोचते. म्हणजेच, दिल्ली ते वैष्णो देवी दरम्यान धावण्यासाठी या गाडीला दोन्ही बाजूंनी 8-8 तास लागतात.