भारतातील असे एक शहर जिथे कोणताही धर्म नाही, पैशांचा व्यवहार नाही, राजकारण नाही; मनाच्या शांततेसाठी एकदा तरी द्या भेट
धर्म, पैसा, राजकारण नसलेले शहर (संग्रहित संपादित प्रतिमा)

आपण कधी खिशातून पैसे खर्च न करता सुखी जीवन जगायचा विचार केला आहे? कोणताही धर्मरहित आयुष्य तुम्हाला हवे आहे? किंवा तुमच्या रोजच्या जगण्यात आजूबाजूला घडणाऱ्या राजकारणाचा हस्तेक्षेप नसावा असे तुम्हाला वाटते? मग तुम्ही पुद्दुचेरी (Puducherry) जवळील विलुप्पूरम जिल्ह्याला नक्की भेट द्या. इथले सूर्योदयाचे शहर म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले ऑरोविल (Auroville) शहर या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. ऑरोविल भारतातील एक असे शहर आहे जेथे जगभरातील पुरुष आणि स्त्रिया शांततेत, सुखात राहतात. इथे लोकांमध्ये आपापसात कोणतेही भांडण नाही, क्षुल्लक राजकारण नाही का पैशांचा व्यवहार नाही.

श्री अरबिंदो सोसायटी प्रकल्पांतर्गत मीरा अल्फासा (मा) (Mirra Alfassa) यांनी 28 फेब्रुवारी 1968 रोजी या शहराची स्थापना केली. शहराची रचना रॉजर अ‍ॅन्गर यांनी केली होती. या युनिव्हर्सल टाऊनशिपमुळे भारतामध्ये विविध बाबतीत परिवर्तन घडेल, या आशेने या शहराची उभारणी केली गेली. ऑरोव्हिलमध्ये आपल्याला मानवतावादाचा उच्च बिंदू दिसेल. जगभरातील 50 वेगवेगळ्या देशांमधून लोक येतात. येथे प्रत्येक जाती, पंथ आणि धर्मातील लोक राहतात. सध्या या शहराची लोकसंख्या 2400 इतकी आहे. साधारण 50 हजार लोक राहू शकतील अशी या शहराची बांधणी केली आहे.

ऑरोविल शहर धार्मिक श्रद्धेच्या पलीकडे, सत्याच्या सेवेवर विश्वास ठेवते. या शहराच्या मध्यभागी एक मंदिर आहे ज्याला ‘मातृमंदिर’ म्हणतात. जे लोक एकात्मिक योग करतात तसेच जे लोक कोणत्याही विशिष्ट धर्माचे किंवा पंथातील नसतात त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची ही जागा आहे. हेच या शहराचे सर्वात मोठे आकर्षण आहे. (हेही वाचा: Philippines मध्ये सुरु झाले बेटावर असणारे जगातील सर्वात महागडे रिसॉर्ट; जाणून घ्या खासियत आणि दर (फोटो))

या शहरामध्ये पैशांद्वारे कोणतेही व्यवहार होत नाहीत. पैशांचा उपयोग फक्त बाहेरील शहरांशी आयात-निर्यात करताना केला जातो. हे शहर चालविण्यासाठी कोणतेही सरकार नाही, इथले ज्येष्ठ लोकच या शहराची संपूर्ण धुरा सांभाळतात. या जागेचे स्वतःचे आर्किटेक्ट आहे. येथे उद्योग तसेच संशोधन संस्था आहेत. येथे फार्म हाऊस आणि रेस्टॉरंट्स देखील आहेत. शिवाय या जागेचे स्वतःचे ई-मेल नेटवर्क देखील आहे. इथे मानवता हा एकच धर्म मानला जातो आणि त्यामुळे इथले सरकार हे जात आणि जातीच्या भेदांपलीकडील आहे. येथे राहण्यासाठी एकच अट आहे  ते म्हणजे इथे सेवक बनून राहणे.

ऑरोविल शहर भारतातील विलूपपुरम (Viluppuram) जिल्ह्यातील प्रायोगिक वस्ती आहे. हे शहर तामिळनाडू आणि दक्षिण भारतातील केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीचा काही भाग मिळून बनले आहे. तर तुम्हालाही एका मोकळ्या, सुखी, आनंदी, शांत आयुष्याचा अनुभव घ्यायचा असेल तर या शहराला नक्की भेट द्या.