विजय माल्या चे नवे ट्विट; 'कर्जाची 100% रक्कम परत देण्याची तयारी होती मात्र बँक आणि ED ऐकत नाही' म्हणत केला मोठा दावा
Vijay Mallya (Photo credits: PTI)

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी प्रत्येक जण आर्थिक मदत करत आहे. अशीच तयारी आता स्वतः किंगफिशर कंपनीचा (Kingfisher Company) सर्वेसर्वा, विजय माल्या (Vijay Mallya) याने सुद्धा दर्शवली आहे. वास्तविक देशाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पळून गेलेला माल्या आता आपण घेतलेले कर्ज 100 टक्के परत करून देशाला मदत करू इच्छित आहे, मात्र त्याच्या या इच्छेला बँक व सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) मदत मिळत नाहीये असा त्याचा दावा आहे. माल्याने नुकतेच याबाबत एक ट्विट करून माहिती दिली. “मी अनेकदा बँकांना 100 टक्के कर्जाची रक्कम परत देण्याची ऑफर दिली आहे. परंतु बँक किंवा ED (सक्तवसूली संचलनालय) ऐकून घेण्यासाठी तयार नाही. या संकटाच्या काळात तरी अर्थमंत्रालय आपलं ऐकेल,” अशी इच्छाही माल्या ने ट्विटमधून व्यक्त केली आहे.

विजय माल्याने ट्विट मध्ये, “केंद्र सरकारनं संपूर्ण भारतात लॉकडाउन केलं आहे. याचा कोणीही विचारदेखील केला नव्हता. आम्ही या निर्णयाचा आदर करतो. यामुळे माझ्या सर्व कंपन्यांचं काम ठप्प झालं आहे. सर्व प्रकारचं उत्पादनही बंद आहे. तरीही आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवत नाही आणि सरकारला पैसे देत आहोत. अशावेळी सरकारला आमची मदत करायला हवी,”असे लिहिले आहे. तर दुसऱ्या ट्विट मधून त्याने आपण अनेकदा बँकांना पैसे परत घेण्याची विनंती केली होती मात्र सहाय्य मिळत नाहीये असे म्हंटले आहे.

विजय माल्या ट्विट

(विजय मल्ल्या 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून जाहीर, मल्ल्याच्या संपत्तीवर जप्तीचे ED चे मार्ग मोकळे) 

विजय माल्याने किंगफिशर एअरलाईन्ससाठी बँकांचे 9 हजार कोटी रूपयांचं कर्ज घेतले होतं मात्र ते अद्यापही फेडलं नाहीये, 2016 मध्ये भारतातून पलायन केलं होतं. आता लंडनमधील न्यायालयात त्याच्यावर  खटला सुरू असून तो जामिनावर बाहेर आहे. तर जानेवारी मध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी मुंबई पीएमएल कोर्टाने विजय मल्ल्या याच्या संपत्तीवर जप्ती करण्याचा निर्णय कोर्टाने सुनावला आहे.