लॉकडाऊनच्या काळात Airtel कडून 8 कोटी ग्राहकांना मोठी भेट; वाढवली प्रीपेड योजनेची वैधता व मिळणार मोफत टॉकटाईम
Bharti Airtel. (Photo Credits: Twitter)

देशभरात सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे लॉक डाऊन (Lockdown) आहे, ज्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. देशातील कमी उत्पन्न असणार्‍या लोकांना सर्वाधिक समस्या भेडसावत आहेत. लोकांच्या अडचणी लक्षात घेता, एअरटेल (Airtel) या मोबाइल कंपनीने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या कमी उत्पन्न गटाच्या आठ कोटीहून अधिक ग्राहकांची प्रीपेड योजना 17 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे, एअरटेलने या आठ कोटी ग्राहकांच्या खात्यावर 10 रुपयांचा टॉकटाईम देण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह कोणत्याही व्यत्ययाशिवाय बोलू शकतील.

पुढील 48 तासात ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच एअरटेलने म्हटले आहे की प्रीपेड योजनेची वैधता संपल्यानंतरही इनकमिंग कॉलची सुविधा सुरू राहील. एअरटेलने आपल्या अशा 8 कोटी ग्राहकांना ही सुविधा दिली आहे जे, खूप कमी रिचार्ज करतात किंवा बहुतेक वेळा वैधता रिचार्ज करतात. कोरोना व्हायरस लॉकडाऊन झाल्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या एअरटेल ग्राहकांना याचा फायदा होईल. या व्यतिरिक्त, एअरटेलने सांगितले आहे की, त्यांची नेटवर्क टीम कनेक्टिव्हिटीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही यासाठी काम करत आहे. (हेही वाचा: Vodafone ने आणला 95 रुपयांत 56 दिवसांच्या वैधतेसह जबरदस्त प्लान)

यासोबतच भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) देखील आपल्या ग्राहकांना दहा रुपयांचा टॉकटाईम जाहीर केला आहे. लॉकडाउन स्थितीमध्ये ज्या ग्राहकांचा बॅलन्स शून्य असेल त्यांना 10 रुपयांचा टॉकटाइम मिळेल असे कंपनीने म्हटले आहे. या व्यतिरिक्त कंपनीने असेही म्हटले आहे ,की ज्या वापरकर्त्यांची वैधता 22 मार्च अखेर संपली होती त्यामध्ये 20 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.