World Test Championship: ICC च्या नियमांमध्ये बदल, ऑस्ट्रेलिया संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या अव्वल स्थानावर; टीम इंडियाची घसरण
टीम इंडिया (Photo Credit: IANS)

World Test Championship: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) कसोटी स्पर्धेचे नियम बदलले आहेत. यानंतर गुणतालिकेत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. बुधवारीपर्यंत दुसर्‍या क्रमांकावर असलेला ऑस्ट्रेलियन संघ (Australian Team) पहिल्या तर अव्वल क्रमांकाचा भारतीय संघ (Indian Team) दुसर्‍या स्थानावर घसरला आहे. गुरुवारी, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे नवीन नियमांतर्गत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Cup Test Championship) बदल करण्यात आले आहेत. सध्या भारतीय संघाचे गुणतालिकेत सर्वाधिक 360 गुण आहेत, तर ऑस्ट्रेलियाचे 296 गुण असून ते भारताच्या तुलनेत 64 गुणांनी मागे आहेत परंतु कसोटी चॅम्पियनशिपचे गुण निश्चित करण्यासाठी आयसीसीकडून (ICC) नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या सरासरीवरुन अंतिम फेरीतले दोन संघ निवडले जाणार आहेत. हा नियम लागू झाल्याने भारतीय संघ दुसर्‍या स्थानावर तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर पोहचला आहे. (World Test Championship Highest Run-Scorers: बाबर आझमची फलंदाजी सरासरी सर्वाधिक, विराट कोहलीलाही पछाडले)

कसोटी चँपियनशिप अंतर्गत भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 4 कसोटी मालिका खेळल्या असून संघाची विजय टक्केवारी 75 टक्के आहे. ऑस्ट्रेलिया संघाविषयी बोलायचे तर त्यांनी 3 मालिका खेळल्या असून त्यांची विजयी टक्केवारी 82.22 टक्के आहे. त्यानुसार भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे तर ऑस्ट्रेलियाने पाहिले स्थान पटकावले आहे. बुधवारपर्यंत भारतीय संघ पहिल्या स्थानावर होता तर ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान काबीज केले होते. जो रुटचा इंग्लंडचा संघ 60.83 टक्के गुणांसह तिसरा तर केन विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंड कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 50 टक्के आहे. पाकिस्तानचा विजय 39.52 टक्के असून ते पाचव्या स्थानावर आहेत. त्यानंतर श्रीलंका, वेस्टइंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांग्लादेश टीम आहेत. पाहा गुणतालिकेत झालेले बदल:

दरम्यान, भारतीय संघाने टेस्ट चॅम्पिअनशिपच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आश्वासक कामगिरी केली होती. त्यांने खेळल्या 4 मालिकांमधून 7 सामने जिंकत अव्वल स्थान मिळवलं होतं. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत झालेला पराभव हा भारताचा कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला आजवरचा एकमेव पराभव होता. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या मालिकेत दोन्ही संघांमध्ये 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.