Women's T20 World Cup 2020: राधा यादव नंतर शेफाली वर्मा ने खेळला तुफानी डाव, श्रीलंकेला 7 विकेटने पराभूत करत भारत लीग स्टेजमध्ये अजिंक्य
भारत महिला क्रिकेट संघ (Photo Credit: Getty Images)

आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपच्या (Women's T20 World Cup) 14 व्या लीग सामन्यात भारतीय महिला संघाने (India Women's Cricket Team) श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध 7 विकेटने विजय मिळवला. आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2020 चे चारही लीग सामने भारताने जिंकले आहेत. हा सामना मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल मैदानावर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले फलंदाजी केली आणि भारतासमोर 114 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने 14.4 ओव्हरमध्ये गाठले आणि 7 विकेटने सामना जिंकला. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा कर्णधार चमारी अटापट्टूने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकांत 9 विकेट गमावून 113 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात भारताने 14.4 ओव्हरमध्ये 3 गडी गमावले आणि शेफाली वर्माच्या (Shafali Verma) 47 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर विजय मिळवला. या खेळीत शेफालीने सात चौकार आणि एक षटकार मारला. शेफाली सलग दुसऱ्यांदा अर्धशतक करण्यात अपयशी ठरली. (Women's T20 World Cup 2020: न्यूझीलंडविरुद्ध तुफान फलंदाजी करणाऱ्या भारताच्या 16 वर्षीय शेफाली वर्मा ने रचला इतिहास, स्ट्राइक रेटमध्ये सर्वांवर केली मात)

अखेरच्या लीग सामन्यात श्रीलंकेला सात गडी राखून पराभूत करून भारताने गट अ मध्ये अव्वल स्थान मिळवले. चारही सामने जिंकून भारताने 8 गुण मिळवले आणि ग्रुपमधील अव्वल स्थान कायम ठेवले. याआधी उपांत्य फेरी गाठणारा भारत पहिला संघ ठरला. त्यांनी पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया, त्यानंतर बांग्लादेश आणि थरारक सामन्यात न्यूझीलंडवर मात केली. श्रीलंकेकडून कर्णधार अटापट्टूने सर्वाधिक 33 धावा केल्या. कविशा दिल्हारीने 25 धावा केल्या. श्रीलंकेचे केवळ चार फलंदाज दुहेरी आकड्याला स्पर्श करू शकले. भारताकडून राधा यादवने (Radha Yadav) 4 ओव्हरमध्ये 23 धावा देऊन 4 गडी बाद केले. आजच्या सामन्यात शेफालीशिवाय स्मृती मंधानाने 17, कर्णधार हरमनप्रीत कौरने 15 धावा केल्या. दीप्ती शर्मा आणि जेमीमाह रॉड्रिग्ज 15-15 धावा करुन नाबाद परतल्या.

आता भारताचा पुढील सामना, सेमीफायनल 5 मार्च रोजी खेळला जाईल. भारताने आजवर एकदाही महिला टी-20 विश्वचषकची गाठली नाही. भारताच्या ग्रुप अ मधून दुसऱ्या स्थानासाठी यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला संघात जोरदार लढत पाहायला मिळत आहे. दोंघाकडे 3 सामन्यात 4 गुण आहेत. ग्रुप अ मधील कोणता संघ पात्र ठरेल याचा निर्णय सोमवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील सामन्यानंतर होईल.